राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे शेतकऱ्यांची चांगलीच ससेहोलपट झाली आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकणामध्ये रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांसमवेत थेट शेतामध्ये जावून आंदोलन केले.
तालुक्यातील तुळसवडे येथे शेतामध्ये जावून रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. संघटनेचे प्रभारी जिल्हाध्यक्ष शैलैश पांचाळ, तुळसवडेचे माजी सरपंच संजय कपाळे, शितल कपाळे, विलास कपाळे, मनोहर आडीवरेकर, रुपेश आडीवरेकर, प्रणय कपाळे, बाबा आडीवरेकर, प्रकाश सुतार, भिकाजी सुतार, योगेश सुतार, अमोल आडीवरेकर, बापु आडीवरेकर, एकनाथ शिवगण, दिवाकर आडीवरेकर, किशोर गराटे, चंदन पांचाळ आदींसह शेतकरी सहभागी झाले.
कोरोना काळात शेतकरी लोकांचे उदरभरण करण्याचे महत्वपूर्ण काम करीत आहेत. असे असले तरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र, शासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे जगाच्या भल्यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोनन करण्यात आले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी. गाईच्या दुधाला ३० रुपये प्रति लिटर बाजार भाव मिळावा, बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी. चक्रीवादळामुळे कोकणातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना त्वरीत मदत करावी. प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना आणि हवामान आधारित फळपिक विमा योजना, या बॅंकांच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत, त्यांच्यावर कार्यवाही करावी, आदी मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.