औरंगाबाद : ‘‘शासन योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून सर्वांगीण प्रगती साध्य करणे शक्य आहे. त्या दिशेने औरंगाबाद जिल्हा वाटचाल करीत आहे,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी (ता. १५) मुख्य शासकीय ध्वजवंदन रावते यांच्या हस्ते झाले. महापौर नंदकुमार घोडेले, खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद पोलिस परिक्षेत्राचे महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील उपस्थित होते.
रावते म्हणाले, ‘‘मराठवाड्यासारख्या कमी पाऊस झालेल्या भागांमध्येही तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. पंतप्रधान पीक विमा योजनेत सन २०१८-१९ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात ६.७१ लाख विमा प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी ६.१३ लाख शेतकऱ्यांना ३६९ कोटी रकमेची विमा नुकसान भरपाई मिळाली. याशिवाय रब्बी हंगामात १.२६ लाख विमा प्रस्ताव प्राप्त झाले असून पेरणी न होऊ शकल्याने जिरायत ज्वारीमध्ये २९ हजार २७३ शेतकऱ्यांना ११ कोटी रुपये देण्यात आले.’’
रावते म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ८ हजार ६४८ लाभार्थ्यांना २५.६१ कोटी रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ६७ हजार ६२८ आहे. त्यांना ६०१ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी ६८ हजार ३७६ शेतकऱ्यांना ४५८ कोटी रुपयांचे खरीप पीककर्ज वाटप केले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत या वर्षांत ३०४ गावांत ३ हजार ९०५ कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी ३ हजार ५०० कामे पूर्ण झाली. ४०५ कामे प्रगतिपथावर आहेत.’’
‘‘मागेल त्याला शेततळेतंर्गत ९१०० लक्षांक असून १३ हजार २३० कामे पूर्ण झाली. १२ हजार ५९१ शेततळ्यांना ६ हजार ४९ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. या योजनेत औरंगाबाद जिल्हा राज्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात यंदा गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनातून १८३ प्रकल्पांतून एकूण २१ लाख २६ हजार ६६४ घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे प्रकल्पांमध्ये २ हजार १२६ सहस्त्र घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता वाढली,’’ असेही रावते यांनी सांगितले.
रावते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय फलोत्पादनातून सामूहिक शेततळे, कांदाचाळ, नियंत्रित शेती, यांत्रिकीकरणाची कामे झाली. त्यात ५ हजार २१५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून यंदा आत्तापर्यंत २ हजार १३७ कुटुंबातील ३८ हजार ७४२ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.