सोलापुरात चारा छावण्यांना अखेर मिळाला मुहूर्त

सोलापुरात चारा छावण्यांना मिळाला मुहूर्त
सोलापुरात चारा छावण्यांना मिळाला मुहूर्त

सोलापूर : दुष्काळाची घोषणा होऊन सहा महिने उलटले, पण जिल्ह्यात अद्यापही चारा छावण्या सुरू होऊ शकल्या नाहीत. नियम, अटीमध्ये अडकलेल्या छावण्यांच्या प्रस्तावांना अखेरीस जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली. पण त्यातही शासनाच्या अटींना अधीन राहण्याची अट आहे. सर्वाधिक सांगोला तालुक्‍यातील ५७ गावांत ६८ संस्थांना मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील अन्य भागांतही टप्प्याटप्प्याने छावण्या सुरू होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

दुष्काळाची तीव्रता वरचेवर वाढते आहे. जिल्ह्यातील बहुतेक सर्व भागातून चारा आणि पाणीटंचाईमुळे टॅंकर, छावण्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे दाखल होत आहेत. आतापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी सव्वाशेच्या वर टॅंकर सुरू करण्यात आले. पण जनावरांच्या चाऱ्यासाठी छावण्यांचे प्रस्ताव नियम, अटीमध्ये अडकले होते. 

जवळपास दीडशेहून अधिक प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहेत. त्यात एकट्या सांगोला तालुक्‍यातील ६० गावांतील सहकारी संस्था, दूध संस्था, नोंदणीकृत संस्थांकडून चारा छावण्यांचे १२४ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे दाखल झाले होते. या कार्यालयाकडून दाखल प्रस्तावांची छाननी करून मंजुरीसाठी ते पुन्हा पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले. पण ते नियम, अटीमध्ये अडकले होते. परिणामी, कुठेच छावण्या सुरू होऊ शकल्या नव्हत्या. पण आता पहिल्या टप्प्यात मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्‍यांतही टप्प्याटप्प्याने याच पद्धतीने खातरजमा करून छावण्यांना मंजुरी देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. 

छावण्यांसाठी ५१ नियम, अटी 

चारा छावण्यांसाठी मंजुरी मिळालेल्या संस्थेने दहा लाख रुपयांची बॅंक गॅरंटी, छावणी चालविणाऱ्या संस्थेने सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत १०० रुपयांच्या बॉण्डवर करारपत्र देणे बंधनकारक केले आहे.

छावणीत किमान ३०० व कमाल ५०० जनावरे दाखल करून घेण्यात यावीत, मंजुरी मिळालेल्या संस्थेने छावणी, नाव, गाव, देय, चारा, देय अनुदान, जनावरांची संख्या इत्यादीचा नामफलक छावणीच्या ठिकाणी गावात, चावडीवर व ग्रामपंचायतीवर सर्वांना दिसेल असे लावावा. जनावरांना प्रवेश देताना विहित केलेल्या नमुन्यात शेतकऱ्यांनी अर्ज द्यावा. यात लहान-मोठी जनावरांची संख्या नमूद करावी. जनावरांचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याला शासनामार्फत कोणतीही नुकसानभरपाई मिळणार नाही, यासाठी संबंधित शेतकऱ्याकडून बंधपत्र करून घेण्याची जबाबदारी छावणी चालकाची असेल. बंधपत्र लिहून न घेतल्यास संबंधित जनावराची नुकसानभरपाईची जबाबदारी छावणी चालकावर असेल आदी ५१ अटी, शर्ती बंधनकार केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com