नांदेड : ‘‘जिल्ह्यात उद्योगाला चालना देऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी, शेतीतून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी कृषी संलग्न तुती लागवड व्यवसायाला प्राधान्य देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यातील दोन हजार एकरांवर तुती लागवडीचे नियोजन आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिली.
डॉ. विपिन म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील वातावरण रेशीम उद्योगास पोषक आहे. या रेशीम उद्योगाला वाव मिळावा, यासाठी २०१६-१७ पासून जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत तुती लागवडीची योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक लाभार्थ्यास तीन वर्षांसाठी तीन लाख २० हजार रुपये अनुदान कुशल व अकुशल माध्यमातून देण्यात येते.
या योजनेअंतर्गत २०२०-२१ अखेर जिल्ह्यातील १४८ गावांत ७०६ शेतकऱ्यांनी ८३३ एकर क्षेत्रावर १ लाख २० हजार ६०० अंडीपुंज घेऊन ८० हजार ५२९ किलोग्रॅम एवढे कोशाचे उत्पादन घेतले.’’ ‘‘या कोशांचे विक्री पूर्णा (जि. परभणी) येथे होत आहे. त्यामुळे भविष्यात या उद्योगाला चालना मिळावी, यातून शेतकऱ्यांना रोजगार मिळावा तुती लागवडीचे उद्दिष्ट ठरविले. जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत अनुदान मिळत आहे,’’ असे डॉ. विपिन म्हणाले. या बाबत नियोजन करण्याचे निर्देश जिल्हा रेशीम अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तालुकानिहाय लागवडीचा लक्ष्यांक
नांदेड, अर्धापूर, मुदखेड, लोहा, कंधार, धर्माबाद, किनवट, हदगाव प्रत्येकी ७५ हेक्टर, देगलूर, मुखेड, बिलोली, माहूर, हिमायतनगर व भोकर प्रत्येकी १० हेक्टर, उमरी व हदगाव प्रत्येकी ७० हेक्टर.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.