नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र वाढले आहे. ११ तालुक्यातील ३८१ गावांना याचा फटका बसला. यापूर्वी ३८ हजार २४२ हेक्टरवरुन आता ८२ हजार ९६० हेक्टरवरील खरिपातील पिकांचे नुकसान झाले. असा प्राथमिक अंदाज प्रशासनाने शासनाला कळविला आहे.
जिल्ह्यात मागील रविवारपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील काही मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढला. अतिवृष्टीचे प्रमाण मुखेड तालुक्यात सर्वाधिक होते.
यासोबत देगलूर, बिलोली, नायगाव, उमरी, धर्माबाद, नांदेड, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, भोकर या तालुक्यातही फटका बसला. काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. नदीकाठी तसेच सखल भागातील खरिपांच्या पिकांसह केळी, ऊस अशा बागायती पिकांचेही नुकसान झाले.
दरम्यान, यापूर्वीच्या पाहणीत जिल्ह्यातील ३८१ गावांतील ३८ हजार २४२ हेक्टरवरील खरिपासह बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. परंतु, नंतरही पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानीचे प्रमाण वाढले आहे.
एनडीआरएफच्या निकषानुसार ५६ कोटी ४१ लाख रुपये मदतीसाठी लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षातून मिळाली. जिल्ह्यातील शेतकरी संघटनांसह राजकीय व सामाजिक संघटनांनी शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.