नाशिक : बदलत्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीच्या तडाख्यात काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गहू काढणीला जोमाने सुरुवात केली आहे. हातातोंडाशी आलेला घास वाया जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांची गहू काढणीची लगबग सुरू आहे.
जिल्ह्यात रब्बीचे एकूण १ लाख १३ हजार १९१ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले होते. मात्र, चालू वर्षी हा आकडा ओलांडून १ लाख ३६ हजार ४३५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. ही टक्केवारी १२०.५४ इतकी आहे. चालू वर्षी ५० हजार हेक्टरहून अधिक पेरण्या झाल्या आहेत. प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे खरीप कांदा खराब झाला. त्यामुळे पुढील टप्प्यात लागवडीसाठी कांदा रोपांचा तुटवडा जाणवू लागल्याने गव्हाच्या पिकाचा पेरा वाढला.
मालेगाव तालुक्यात गव्हाच्या पेरण्या चारपटीने झाल्या आहेत. त्याखालोखाल बागलाण, कळवण, देवळा, सुरगाणा, निफाड सिन्नर, येवला या तालुक्यामध्येही गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.
काढणीच्या दरात वाढ
गहू सोंगणीला मजुरांची टंचाई आहे. यांत्रिकीकरण पद्धतीने काढणीवर शेतकऱ्यांचा जोर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पेरण्या अधिक झाल्या. त्यामुळे यंत्रांद्वारे गव्हाच्या काढणीच्या दरात एकरी २०० ते ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी हे दर १५०० ते १६०० रुपयांपर्यंत होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.