नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा इशारा दिला. मात्र त्याचा गैरफायदा घेत काही व्यापारी भीती दाखवून शेतीमाल कमी दराने खरेदी करत असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे हा लॉकडाउन नकोच, या भूमिकेवर जिल्ह्यातील शेतकरी ठाम आहेत. त्यास विरोध दर्शवित ‘नो लॉकडाउन’ची मोहीम शेतकऱ्यांसह तरुणाईने हाती घेतली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काहीच दुमत नाही. मात्र लॉकडाउनचा इशारा दिल्याने शेतीमालाच्या विक्रीत अडचणी निर्माण झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे सरकारने कडक निर्बंध लावावेत. नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. मात्र लॉकडाउन करू नका असा शेतकऱ्यांचा सूर आहे. अन्यथा, आम्ही अडचणीत येऊ, उद्ध्वस्त होऊ, अशी रोखठोक भूमिका शेतकऱ्यांनी समाज माध्यमांवर मांडायला सुरुवात केली आहे.
सोशल मीडियावर ट्रेंड सोशल मीडियावर शेतकऱ्यांनी स्वतःची भूमिका मांडायला सुरुवात केली आहे. एकीकडे गर्दी नियंत्रित न झाल्यास बाजार समित्या बंद ठेवण्याचा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी गोंधळात आहे. त्याअनुषंगाने ‘#शेतकरी_वाचवा’,‘#No_Lockdown’ चा ट्रेंड शेतकऱ्यांकडून समाज माध्यमांवर सुरू झाला आहे. तसेच यापूर्वी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.
शेतकरी म्हणतात...
लॉकडाउनचे संकट डोक्यावर घोंघावतेय. अडचणीच्या काळात संकटे सोसून कामकाज केले. आमच्या कष्टाचा कधी विचार होणार? - किरण मोरे, कांदा उत्पादक, ठेंगोडा, ता. सटाणा लॉकडाउन नंतर शेतीमाल शहरात पोहोचू शकत नाही. याचा दलाल फायदा घेणार. त्यामुळे नुकसान कोण भरून देणार हे सांगावे. - वाल्मीक सांगळे, जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.