नाशिकच्या द्राक्षाला निर्यातीची गोडी

नाशिक जिल्ह्यातील अर्थकारण द्राक्ष शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी व निर्यातदारांनी शासकीय यंत्रणेच्या निकषानुसार निर्यात करावी. ज्या देशात निर्यात होते त्या देशातील गुणवत्तेची प्रतवारी व तांत्रिक निकष पाळले जावेत, अशी द्राक्ष बागायतदार संघाची भूमिका आहे. जर निकष पाळले गेले नाहीत, तर निर्यातीवर मोठा फटका बसू शकतो. - कैलास भोसले, खजिनदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.
द्राक्ष निर्यात
द्राक्ष निर्यात

नाशिक : द्राक्ष हंगामाला सुरवात झाल्यानंतर बागलाण तालुक्याने या वर्षीही नंबर पटकावला. नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना युरोपात चांगली मागणी होती. सुरवातीला द्राक्ष उत्पादकांना अर्ली हंगामात चांगले दर मिळाले. मात्र जानेवारी महिन्याच्या शेवटी व फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे निर्यातीवर परिणाम झाला होता. मात्र सध्या सुरळीत झालेली निर्यात व वाढलेली मागणी यामुळे चालू हंगामात विक्रमी निर्यात झाली आहे.  रशियामध्येही मागील महिन्यात तांत्रिक अडचणींमुळे होणारी द्राक्ष निर्यात मंदावली होती. निर्यातीमध्ये वाढ झाल्याने रशियातील वनस्पती संगरोध विभाग (प्लांट कोरंटाईन बोर्ड) यांच्या तांत्रिक तपासणीमुळे कंटेनर क्लिअरिंगकरिता वेळ लागत होता. त्यामुळे कामकाज संथ झाले होते. थोड्याफार प्रमाणात निर्यात सुरू होती. मात्र रशियात पुन्हा निर्यात सुरळीत सुरू झाली आहे. निर्यातदारांनी रशियामध्ये द्राक्ष पाठविण्याचे काम सुरू केले आहे. रशियामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जास्त निर्यात झाल्याचे दिसून येते. मागील वर्षी रशियामध्ये १८,५१३ टन द्राक्षाची निर्यात झाली. या वर्षी निर्यात १८,८२० टनांवर पोचली आहे. युरोपमधील नेदरलँड, जर्मनी, ब्रिटेन या देशात निर्यातीचा टक्का मागील वर्षाच्या तुलनेत वाढला आहे. मागील वर्षीच्या हंगामात युरोपमध्ये ८०,६१९ टन द्राक्षाची निर्यात झाली होती. यंदाच्या २०१८-१९ च्या चालू वर्षाच्या निर्यातीमध्ये ८ मार्च २०१९ अखेर ही निर्यात ४७,२५७ टनांपर्यंत पोचली आहे. अशी माहिती नाशिक कृषी विभागाकडून देण्यात आली.  नाशिक जिल्ह्यातील अर्ली द्राक्ष हंगाम संपला असून फक्त नाशिक, दिंडोरी, चांदवड, निफाड तालुक्यांतील बागा शिल्लक आहेत. हंगामाच्या मध्यावधीत झालेली विक्रमी निर्यात शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. अजून हंगाम मेपर्यंत चालणार आहे. सोशल मीडिया व इतर माध्यमांतून निर्यात बंद झाल्याचे सांगण्यात येत होते; मात्र रशियामध्ये आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने काटेकोरपणे तांत्रिक निकषांप्रमाणे तपासणी होत असल्याने निर्यात मंदावली होती. सध्या वाढलेली मागणी, सुरळीत झालेली निर्यात व दरात होत असलेली सुधारणा यामुळे वातावरण आशादायक आहे.  जागतिक बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची मागणी टिकून राहावी यासाठी शासनाकडूनही निर्यातीसंबंधीचे निकष तपासून कामकाज सुरू आहे. चालू हंगामात निर्यातीचे सातत्य टिकविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील असून, मालाची काटेकोरपणे तपासणी करूनच कंटेनर पाठविले जात आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक, निर्यातदार व संबंधित घटकांनी सर्व निकष पाळणे व यंत्रणेला सहकार्य करणे अपेक्षित आहे. त्यावरच निर्यातीचे गणित अवलंबून असणार आहे.  प्रतिक्रिया द्राक्षाची वाढलेली निर्यात उत्पादकांसाठी फायदेशीर आहे. द्राक्ष निर्यात करताना उत्पादकांनी एमआरएल तपासण्या करूनच माल पाठवावा. रेसिड्यू फ्री तपासणी होत नसेल तरी उत्पादकांनी काळजी घ्यावी. रेसिड्यू फ्री तपासणीची सवय लावून घ्यावी. ही उत्पादकांसाठी फायदेशीर ठरणारी आहे.  - जगन्नाथ खापरे, भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना.  मागील वर्षाच्या तुलनेत चालू हंगामात युरोप व इतर देशात द्राक्षांची निर्यात वाढली आहे. त्यामुळे निर्यातदारांनी विशेष काळजी घ्यावी व तांत्रिक निकष पळून द्राक्षांची निर्यात करावी.  - नरेंद्र आघाव, कृषी उपसंचालक, नाशिक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com