नाशिक : नाशिक बाजार समितीवर राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. या बाजार समितीत मागील २० वर्षांपासून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार, अफरातफरी, गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील आणि नाशिक शहर सरचिटणीस सुनील केदार यांनी ईडीकडे तक्रार केली आहे.
पाटील व केदार यांनी ईडीला दिलेल्या पत्रासोबत २०१३-२०१४ चा महाराष्ट्र शासनाचा सरकारी लेखा परिक्षण अहवाल दिला आहे. त्यात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, अफरातफरी, घोटाळा झाला आहे. एका वर्षात ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे, तर २० वर्षात हा आकडा निश्चितच हजारो कोटींच्या घरात जाईल. ही बाब गांभीर्याने विचारात घेत दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करावी. शासनाचे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची वसुली व्हावी, अशी मागणी त्यांनी ईडीकडे केली आहे.
यापूर्वी बाजार समितीतील घोटाळ्याची तक्रार करण्यात आली. मात्र सरकारकडून त्यास स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. आता या संबंधी चौकशी करून वसुली होईल, असे वाटत आहे. - दिनकर पाटील, भाजप नगरसेवक, नाशिक.
नुकत्याच झालेल्या सेंट्रल गोदावरी कृषक सेवा सहकारी संस्था निवडणुकीत दिनकर पाटील यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. ही तक्रार सुडापोटी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी पाटील यांनी माझ्यासह सभापती व अन्य संचालकांना शिवीगाळ केली. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. संचालक मंडळाने शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांच्या संचालकपद रद्द करण्याबाबत ठराव केला आहे. त्यामुळेच ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत. - देविदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.