कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील शेतकऱ्यांना पाठबळ: नवाब मलिक

कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी परीक्षा कशी देतात, प्रात्यक्षिक कसे करतात, हे प्रत्यक्ष पाहता आले. प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांशी चर्चा करता आली. याचा आनंद झाला. - नवाब मलिक, कौशल्य व उद्योजकता विकासमंत्री तथा पालकमंत्री, परभणी
Nawab malik
Nawab malik

परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियानातून राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये गटशेतीचे महत्त्व पटू लागल्याचा अनुभव आज आला. एकत्रित येऊन उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा विचार या शेतकऱ्यांच्या मनामध्ये रुजविण्यात हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या कंपन्यांमध्ये शेतकरी-कारखानदार तयार करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, कृषी आणि उद्योग या विभागांनी एकत्रितपणे हा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली.  दामपुरी (जि. परभणी) येथे शनिवारी (ता. २५) कृषी कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी एपी ग्लोबालेचे कार्यकारी उपाध्यक्ष (ईमर्जिंग बिझिनेस) बॉबी निंबाळकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार सुरेश जाधव, सकाळ मराठवाडा आवृत्तीचे निवासी संपादक दयानंद माने, दामपुरीच्या सरपंच सुरेखा गंगाधरराव गमे, सहयोगी संपादक रणजित खंदारे, सिमॅसिस लर्निंग एलपीपीचे सहसरव्यवस्थापक अमोल बिरारी, महाराष्ट्र राज्य उद्योजकता प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख जयंत तांबरे, एक्स्पर्ट नेटचे प्रकल्प व्यवस्थापक जालिंदर गायकवाड, रोहित बडगुजर आदी उपस्थित होते. श्री. बिरारी यांनी प्रास्ताविकात कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा आढावा सादर केला.  मंत्री नवाब मलिक म्हणाले, ‘‘राज्यातील लहान शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गट स्थापन करून एकत्र येणे आवश्यक आहे. सोयाबीन, कापसाला चांगला भाव मिळण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून विक्री केल्यास अधिक फायदा होईल. त्यासाठी हा कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. प्रक्रिया उद्योगामुळे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांना उद्योग उभारणीसाठी मदत करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे. चांगल्या प्रक्रिया उद्योगासाठी तयारी केलेल्या शेतकरी गटांना जागा, मदत देण्यासाठी सोयाबीन, हळद, कापूस यासारखी त्या त्या भागातील प्रमुख पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीसाठी उद्योगमंत्र्यांशी बोलून एमआयडीसीमध्ये शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू. कृषी कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये प्रशिक्षित शेतकऱ्यांना सरकारकडून होईल ती मदत देण्यासाठी प्रयत्न करू. शेतकरी गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील.’’  या वेळी दामपुरी, ठोळा, उमरी (ता. परभणी), फुलकळस (ता. पूर्णा), चौंडी आंबा, (ता. वसमत, जि. हिंगोली), जाफ्रबाद (जि. जालना) या ठिकाणचे प्रशिक्षणार्थी शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com