गरज कांदा उत्पादक कंपन्यांची...

मध्यमवर्गीय ग्राहक आणि उत्पादक शेतकरी या दोघांच्याही अर्थकारणावर प्रभाव टाकणारे आणि निर्यात धोरणामुळे कायम चर्चेत असणारे कांदा, हे महत्त्वाचे नगदी पीक. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादनात आघाडीवर आहे.
The need for onion growing companies
The need for onion growing companies

मध्यमवर्गीय  ग्राहक आणि  उत्पादक शेतकरी या दोघांच्याही अर्थकारणावर प्रभाव टाकणारे आणि निर्यात धोरणामुळे  कायम चर्चेत असणारे कांदा, हे महत्त्वाचे नगदी पीक. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादनात आघाडीवर आहे.  लासलगाव (जि.नाशिक)  ही सर्वात मोठी कांदा  बाजारपेठ आहे. नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नंदुरबार, भंडारा आणि लातूर हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. आपल्याकडे देशांतर्गत तसेच परदेशातील बाजारपेठांमधील बाजारभावाची माहिती उपलब्ध आहे. पण साठवणुकीच्या पायाभूत सुविधा आणि वाहतुकीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. भारतीय कांद्यासाठी बांगलादेश, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती या मोठ्या निर्यात बाजारपेठा आहेत. पुण्याजवळ  इंदापूर येथे आधुनिक पॅक हाऊससह निर्यात सुविधा केंद्र उभारले आहे. परंतु हे निर्यात सुविधा केंद्र पूर्ण क्षमेतेने वापरले जात नाही. साठवणुकीतील कांद्याला कोंब  फुटून  नासाडी होते. हे टाळण्यासाठी लासलगाव (जि.नाशिक)  येथे कांदा विकीरण युनिट उभारण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सुधारित पद्धतीने लागवड करत आहेत. कांद्याचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन मंडळामार्फत कांदाचाळी सारख्या अनुदानाच्या विविध योजना राबविल्या जातात. मात्र शेतकऱ्याला परवडणारी किफायतशीर वाहतूक सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. लागवड क्षेत्राच्या परिसरात बाजार सुविधांची उपलब्धता गरजेची आहे, तरीही उत्पादनाचा विचार करता साठवणूक सुविधांची मोठी कमतरता आहे. कांदा शेतीसमोरील आव्हाने 

  • वर्षानुवर्षे पारंपारिक बियाणांचा वापर केला जातो. तसेच बियाणे बदलण्याचे कमी प्रमाण या मुख्य समस्या आहेत. कांदा उत्पादनात भारत जागतिक  क्रमवारीत दुसऱ्या  स्थानावर आहे. मात्र उत्पादकता कमी आहे. प्रमाणित बियाण्यांचा अपुरा पुरवठा, बियाणे बदलण्याचे कमी प्रमाण, मजुरांची समस्या नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात असणारी नकारात्मकता आणि यांत्रिकीकरणाचा अभाव यामुळे उत्पादकता कमी आहे.
  • कांदा उत्पादनाच्या प्रमाणात साठवण सुविधांची मोठी कमतरता आहे. सर्व हंगामामध्ये ( खरीप, उशिराचा खरीप आणि रब्बी)  कांद्याची लागवड होत असताना केवळ रब्बी हंगामातील कांद्याची साठवण करता येते. एकूण उत्पादनाच्या ६० टक्के कांदा उत्पादन रब्बी हंगामात होते. हा कांदा एप्रिल- मे  मध्ये बाजारात येतो, जो खरीप कांद्याचे आगमन बाजारात होईपर्यंत (ऑक्टोबर -नोव्हेंबर) देशांतर्गत तसेच निर्यातीची मागणी भागविण्यासाठी साठविला जातो. रब्बी कांद्याचा साठा संपत आलेला असतो  आणि खरीप कांदा बाजारात यायला अवकाश असतो. याच काळात कांद्याचे दर वाढतात. मागणी पुरवठ्याच्या समतोलामध्ये साठवणुकीच्या सुविधांचे अनन्य साधारण  महत्त्व आहे. नेमक्या या सुविधांच्या अभावामुळेच कांद्याचे भाव अस्थिर असतात. रब्बी कांदा साठविण्यासाठी अतिरिक्त शास्त्रशुद्ध साठवण सुविधा उपलब्ध करता येऊ शकतात. रब्बी कांदा उत्पादनापैकी किमान २५ टक्के उत्पादन साठवणुकीची  सुविधा उत्पादक तालुक्यांमध्ये करणे आवश्यक आहे.
  • नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतले जात असले तरी प्रक्रिया सुविधा अल्प प्रमाणात उपलब्ध आहेत.  नाशिक जिल्ह्याला कांदा उत्पादनाची राजधानी म्हणून ओळखले जात असले तरी गुजरातमधील भावनगर जिल्हा कांदा प्रक्रियेचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे आले आहे. नाशिक आणि परिसरात कांदा प्रक्रिया उद्योग अधिक प्रमाणात सुरू केले जाऊ शकतात.
  • बाजार समित्यांमध्ये कमी स्पर्धात्मकता, हाताळणीमधील  त्रुटी, विविध कपाती आणि मुख्य म्हणजे दलालांची छुपी साखळी यामध्ये उत्पादक शेतकरी भरडला जातो. अनेकदा संगनमताने भाव पाडले जातात.
  • कांदा पिकातील मूल्यवर्धन व पुरवठा साखळीमध्ये वित्त सहाय्याचा मोठा अभाव आहे. 
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकारी  सेवा सोसायट्या  अजूनही ग्रामीण भागात पीक कर्जाचा स्रोत आहेत. या बँकांची आर्थिक स्थिती,शिस्त, थकीत कर्जाचे प्रमाण  पाहता व्यावसायिक बँकांना लहान लहान सीमांत शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता  आहे. 
  • कांदा साठवणुकीसाठी गोदामे, मोठ्या कांदा चाळी उभारण्यास बँका कर्जपुरवठा करत नाहीत. साठवणूक सुविधांअभावी मागणी- पुरवठा समतोल आणि किंमत स्थिरता साध्य होत नाही. याचा उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसतो.
  • कांद्याच्या मागणी पूर्वानुमानाची कोणतीही सांख्यिकी माहिती उपलब्ध नसते. बँका देखील  कर्जपुरवठ्याच्या पीकनिहाय नोंदी ठेवत नाहीत. कांदा पीकही त्याला अपवाद नाही.
  • देशांतर्गत कांद्याची मागणी  पुरविण्यासाठी सरकार कांदा निर्यातीवर नियंत्रण आणते. परंतु  याचा बहुतेक वेळा अंतर्गत बाजारावर  साठेबाजी सारखा विपरीत परिणाम  होतो आणि  अस्थिरता निर्माण होते. स्थिर निर्यात धोरणाचा अवलंब केल्यास भावामध्ये काही प्रमाणात स्थिरता साध्य करता येईल.
  • उत्पादक कंपन्यांची गरज  विविध पीक गटांसाठी उत्पादक कंपन्या काम करत आहेत. खास कांदा पिकामध्ये काम करणाऱ्या उत्पादक  कंपन्यांची गरज आहे.कांदा पिकामध्ये एकत्रीकरण, प्रक्रिया व विपणन  हे  शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे करणे महत्त्वाचे आहे.  राज्यातील कृषी विद्यापिठे आणि राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन संचालनालयाने विविध जाती, लागवड तंत्रज्ञान विकसित केले आहे. याचबरोबरीने अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून अभ्यासातून लागवड, मशागतीतील समस्यांवर मार्ग शोधले आहेत.अवजारे तयार केली आहेत या सर्वांची शास्त्रशुद्धता तपासून,दस्तऐवजीकरण करून  कांदा उत्पादकांच्यापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. याचबरोबरीने काढणीपश्‍चात तंत्रज्ञान आणि बाजार भाव माहिती विश्लेषणामध्ये अधिक संशोधनाची गरज आहे संपर्क ः विजयकुमार चोले, ९४२०४९६२६०,  (उपाध्यक्ष, सातारा मेगा फूड पार्क)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com