नगर ः शासन व ग्रामीण भागातील जनतेचा दुवा म्हणून काम करणाऱ्या, तलाठी व मंडलाधिकाऱ्यांच्या निवास व्यवस्थेसह लाखो रुपये खर्चून बांधलेल्या तालुक्यातील ७१ तलाठी कार्यालयांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे सुमारे ३५ वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या २०१० ते २०१४ या महसूल मंत्रिपदाच्या काळात राज्याच्या महसूल विभागात अनेक आमूलाग्र व धोरणात्मक बदल केले. राजस्व अभियान, संगणकीय सात-बारा, जमीन मोजणी, जागेची नोंदणी व बिगरशेती करणे, तलाठ्यांना लॅपटॉप अशा त्यांच्या कामाची लिम्का बुकला नोंद घ्यावी लागली.
महसूल विभागाचे तलाठी व मंडलाधिकारी यांचा ग्रामीण भागातील शासकीय कामांवर मोठा प्रभाव असतो. च्या कामात सुलभता येण्यासाठी राज्यातील पहिला तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय व निवासस्थान एकत्र असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत संगमनेर तालुक्यातील ६२ तलाठी व ९ मंडळ कार्यालये याप्रमाणे ७१ गावांत प्रशस्त इमारती बांधण्यात आल्या. मात्र, गेल्या पाच वर्षांत एकाही ठिकाणी तलाठी किंवा मंडलाधिकारी रहिवास करीत नसल्याने या इमारतींची दुरवस्था झाली आहे. केवळ कार्यालयीन उपयोगासाठी या इमारतीचा तळमजला वापरण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या १८ नोव्हेंबर २०११ च्या निर्णयानुसार या प्रत्येकी ८०.११५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ७१ इमारतींसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद असणाऱ्या अंदाजपत्रक व नकाशास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र, महसूल खात्याच्या मागणीनुसार औरंगाबादच्या वास्तुशास्त्रज्ञांनी मंजूर केलेल्या नकाशानुसार हे काम १०७.६० चौरस मीटर इतके वाढवले गेले. यामुळे अंदाजपत्रकी किमतीत वाढ झाल्याने ७१ कार्यालयांसाठी १५ कोटी ९२ लाख ७६ हजार ६५६ रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. सर्व सुविधांयुक्त इमारती असूनही येथे कर्मचारी निवासी राहात नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.