पाडव्याच्या वायद्यात शेतमालाच्या भावाचा वांदा

पाडव्याच्या वायद्यात शेतमालाच्या भावाचा वांदा
पाडव्याच्या वायद्यात शेतमालाच्या भावाचा वांदा

लातूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने गुढीपाडवा हा सर्वात महत्त्वाचा सण आहे. या निमित्ताने शेतकरी वर्षभरासाठी सालगड्यासोबत वायदे करतात, करार करून घेतात. यातूनच मोठ्या प्रमाणात तूर, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी बाजारात येत आहे. पण याला हमीभावदेखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. याच शासनाने तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचा फार्स केला. यात गेल्या दीड महिन्यात एकट्या लातूर जिल्ह्यातील सात हजार शेतकऱ्यांना शासनाने एक रुपयाही पेमेंट केलेले नाही. या शेतकऱ्यांचे ४० कोटी रुपये थकले आहेत. या वर्षी पाडव्याच्या वायद्यात शेतमालाच्या भावाचा वांदा राहिल्याने शेतकरी अडचणीत आहेत.

हजार ते बाराशेने भाव पडलेले पाडव्याच्या तोंडावर अडत बाजारात तूर, हरभरा ही दोन महत्त्वाचे शेतमाल बाजारात येतात. सध्या या दोन्ही शेतमालांची मोठी आवक आहे. तुरीला शासनाचा क्विंटलला ५४५० तर हरभऱ्याला ४४०० रुपये प्रति क्विंटलला हमी भाव आहे. पण बाजारात मात्र हरभरा सरासरी ३४०० व तूर ४२०० रुपये प्रति क्विंटलने विकली जात आहे. हमी भावापेक्षा हजार ते बाराशे रुपये कमी भावाने तूर, हरभरा विक्री शेतकऱ्यांना हंगाम काढणीपासून करावी लागत आहे.

पैसेही वेळेवर मिळेनात शासनाने दीड महिन्यापूर्वी हमी भावाप्रमाणे तूर खरेदी केंद्र सुरू केले आहेत. लातूर जिल्ह्यात यात ३६ हजार १२५ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. आतापर्यंत सात हजार १०९ शेतकऱ्यांनी ७२ हजार १३९ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे. पण त्याचा एक रुपयाही शेतकऱ्य़ांना दिला गेला नाही. ४० कोटी रुपये शासनाकडे थकले आहेत. त्यात आणखी २९ हजार शेतकऱ्यांची तूर खरेदी केंद्रावर आलेली नाही ती आल्यानंतर तर हा आक़डा मोठा होणार आहे. पण पैसेच मिळत नसल्याने शेतकरी कमी भावाने आपला माल बाजारात विकत आहेत. हरभऱ्याचीदेखील एक हजार ७४७ शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. याची तर खरेदी सुरूच झालेली नाही. त्यामुळे शासनाकडून खरेदीचा केवळ फार्स केला जात असल्याचे चित्र आहे.

सालगड्याची मनधरणी करण्याची वेळ गुढी पाडव्यादिवशी शेतकरी सालगड्यासोबत वर्षभरासाठी करार करतात. सध्या सालगड्याचे लाखावर दर आहेत. त्यांना पाडव्या दिवशी ७५ टक्के रक्कम अागावू दिली जाते. आज अनेक शेतकऱ्यांची ही रक्कमही देण्याची परिस्थिती नाही. पण करार तर करावा लागणार आहे. त्यामुळे सध्या तरी सालगड्याची खूप मनधरणी शेतकऱ्यास करावी लागत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ७२ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. पण अद्याप पेमेंट झालेले नाही. मुला मुलींचे लग्न, रुग्णालयासाठी शेतकरी पैसे मागत आहेत. एका शेतकऱ्याने तर मुलीचे लग्न मोडत आहे, मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असे मोबाईलवरून सांगितले आहे. याची सर्व माहिती संबंधीतांना कळविण्यात आली आहे. - वाय. ई. सुमठाणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी. 

तुरीसाठी आॅनलाइन नोंदणी केली. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी नंबर आला. गेल्या दहा फेब्रुवारीला २४ क्विंटल तूर अहमदपूरच्या खरेदी केंद्रावर विक्री केली आहे. वारंवार चकरा मारूनही पैसे मिळत नाहीत. वरून आल्यानंतर तुमच्या खात्यावर जमा होतील, असे सांगितले जात आहे. पाडव्याला सालगडी ठेवावे लागतात. त्यांना ६० ते ७० टक्के रक्कम अगाऊ द्यावी लागते. पैसे वेळेवर मिळत नसल्याने अडचणी आहेत. - भारत येरमे, शेतकरी, वळसंगी, ता. अहमदपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com