नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी कृषी विभागासह विद्यापीठे प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात असले तरी नगर जिल्ह्यामध्ये मात्र वरचेवर तेलबियांच्या पेरणीचे क्षेत्र घटत चालले आहे. यंदाच्या रब्बीत तब्बल नऊ तालुक्यांत एकही हेक्टर तेलबियांची पेरणी झालेली नाही. मुळात करडई, तीळ, सूर्यफूल, जवस यासह इतर तेलबियांचे सरासरी क्षेत्र मोजकेच असताना पेरणी झालेल्या पाच तालुक्यांत पेरणीचे क्षेत्र सरासरीच्या अवधे नऊ टक्के आहे.
खरिपात सोयाबीन तर रब्बीत करडई, तीळ, सूर्यफूल, जवस यासह इतर तेलबियांचे उत्पादन घेतले जाते. अलीकडच्या दहा वर्षांत तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात वरचेवर घट होत असल्याने कृषी विभाग, विद्यापीठाने तेलबियाच्या पेरणी क्षेत्रात वाढ व्हावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अजून तरी त्यात वाढ होताना दिसत नाही.
नगर जिल्ह्यामध्ये रब्बीचे ४ लाख ९४ हजार ५१३ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यात करडई, तीळ, सूर्यफूल, जवस यासह इतर तेलबियां(गळीत धान्य)चे सर्वात कमी म्हणजे अवघे १२७० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. रब्बीमधील सरासरीच्या अर्धा टक्काही क्षेत्र तेलबियांचे नाही. त्यातही यंदा १२७० एेवजी केवळ ११६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामुळे तेलबियांची पेरणी होत नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. यंदा श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, राहुरी, राहाता, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहाता या नऊ तालुक्यांत एकही हेक्टर क्षेत्रावर तेलबियाची पेरणी नाही. पेरणी झालेल्या नगर तालुक्यात ५ हेक्टर, पारनेरमध्ये पंधरा हेक्टर, कर्जतमध्ये चार हेक्टर, जामखेडमध्ये ८० हेक्टर व पाथर्डी तालुक्यात १२ हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे.
बाजारात मागणी असतानाही तेलबियाचे क्षेत्र कमी का होतेय? कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून तेलबियांचे क्षेत्र वाढीसाठी काही प्रयत्न केले जात नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.