चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान धडकणार; अतिवृष्टीचा इशारा 

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत घोंगावत असलेले ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान अलिबाग नजीककिनारपट्टीलाधडकणार आहे.
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान धडकणार; अतिवृष्टीचा इशारा 
चक्रीवादळ अलिबागजवळ १ ते ३च्या दरम्यान धडकणार; अतिवृष्टीचा इशारा 

पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत घोंगावत असलेले ‘निसर्ग’ तीव्र चक्रीवादळ दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान अलिबाग नजीक किनारपट्टीला धडकणार आहे. वादळ धडकताना ताशी ११० ते १२० किलोमीटर चक्राकार वारे वाहून, मुसळधार पाऊस पडणार असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. आज (ता.३) दुपारपर्यंत हे वादळ हरिहरेश्‍वर व दमन दरम्यान जमिनीवर येण्याची शक्यता असून, रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ किनाऱ्याला धडकण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत मंगळवारी (ता.२) दुपारी चक्रीवादळाची निर्मिती झाली. आज (ता.३) पहाटे हे वादळ आणखी तीव्र झाले. ही वादळी प्रणाली वेगाने महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे झेपावत असून, समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. तर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली आहे. वादळाचे केंद्र अलिबागपासून १४० किलोमीटर, मुंबईपासून १९० किलोमीटर, तर गुजरातच्या सुरतपासून ४१५ किलोमीटर नैर्ऋत्येला आहे. या कमी दाब क्षेत्राचे केंद्र ताशी १२ किलोमीटर वेगाने किनाऱ्याकडे सरकत आहे. दुपारपर्यंत ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हे वादळ धडकणार आहे. 

या वादळामुळे रायगड, मुंबई, ठाणे जिल्ह्यात ताशी १०० ते १२० किलोमीटर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी ८५ ते १०५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा किनाऱ्यालगत समुद्रात १ ते २ मीटर उंच लाट उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीलगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. या वादळामुळे किनारपट्टीलगतची कच्ची घरे, घरांची छपरे, पत्रे उडून जाण्याची, विजेचे आणि टेलिफोनचे लाइन, कच्चे, पक्के रस्ते खराब होण्याचे, तसेच रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. तर झाडांच्या फांद्या, केळी, पपईच्या बागा, किनारपट्टीय भागातील पिकांना तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीय जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. 

आज अतिवृष्टीचा इशारा  मंगळवारी सायंकाळपासून किनाऱ्यावर जोरदार वारे वाहू लागले असून, आज (ता.३) कोकण, गोव्यात मुसळधार, तर उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वादळ धडकताना उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात केवळ २४ तासांत २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव,पुणे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण गुजरात दमण, दादरा नगर हवेली मध्ये जोरदार, मध्य प्रदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  चक्रीवादळाचा मार्ग...

  • ताशी ११० ते १२५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार 
  • २४ तासांत २००मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाचा अंदाज 
  • मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला तडाखा 
  • नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे जिल्ह्यालाही फटका शक्य
  • आंबा, काजू, केळी, पपई, द्राक्षे, डाळिंब, सीताफळ फळबांगाना धोका 
  • झोपड्या, कच्ची बांधकामे, रस्ते उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com