‘निसर्ग’ चक्रीवादळ आज अलिबागजवळ धडकणार 

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राच्या किनाऱ्याला एकही वादळ धडकले नाही. मात्र निसर्ग वादळ अलिबागजवळ धडकणार असून, आज (ता.३) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, जिल्ह्यात तर उद्या (ता.४) नाशिक, नंदुरबार धुळे जिल्ह्यात वादळाचा प्रभाव दिसेल. पुणे, नगर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. - डॉ. अनुपम कश्‍यपी, हवामान अंदाज प्रमुख, पुणे वेधशाळा
cyclone
cyclone

पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत मंगळवारी (ता.२) दुपारी १.४५ वाजता ‘निसर्ग’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, रात्री उशिरा या प्रणालीचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीलगत ताशी ११० ते १२५ किलोमीटर चक्राकार वारे वाहून हे ‘चक्रीवादळ’ आज (ता.३) दुपारपर्यंत हरिहरेश्‍वर व दमन दरम्यान जमिनीवर येणार असून, रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ किनाऱ्याला धडकण्याचा, तसेच उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत मंगळवारी (ता.२) सकाळी कमी तीव्रतेचे वादळ (डीप डीप्रेशन) होते. त्याची तीव्रता वाढून दुपारी चक्रीवादळाची निर्मिती झाली. ही वादळी प्रणाली गोव्याच्या पणजीपासून वायव्यकडे २९० किलोमीटर, तर मुंबईपासून ३८० किलोमीटर, तर गुजरातच्या सुरतपासून ६०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे आहे. या कमी दाब क्षेत्राचे केंद्र ताशी ११ किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. रात्री उशिरापर्यंत अरबी समुद्रात तीव्र चक्रीवादळ घोंगावणार असून, ते महाराष्ट्र व गुजरातच्या किनाऱ्याकडे येणार आहे. 

या वादळामुळे आज (ता.३) महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत रायगड, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने, तर गुजरातच्या वलसाड, नवसारीसह दमण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी ९० ते १०० वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र, गुजरात, गोवा किनाऱ्यालगत समुद्रात १ ते २ मीटर उंच लाट उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीलगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. 

या वादळामुळे किनारपट्टीलगतची कच्ची घरे, घरांची छपरे, पत्रे उडून जाण्याची, वीजेचे आणि टेलीफोनचे लाईन, कच्चे, पक्के रस्ते खराब होण्याचे, तसेच रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. तर झाडांच्या फांद्या, केळी, पपईच्या बागा, किनारपट्टीय भागातील पिकांना तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीय जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.  आज अतिवृष्टीचा इशारा  मंगळवारी सायंकाळपासून किनाऱ्यावर जोरदार वारे वाहू लागले असून, आज (ता.३) कोकण, गोव्यात मुसळधार, तर उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वादळ धडकताना उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात केवळ तासाभरात २०० ते २४० मिलिमीटर, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव,पुणे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण गुजरात दमण, दादरा नगर हवेली मध्ये जोरदार, मध्य प्रदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  असा होईल परिणाम...

  • ताशी ११० ते १२५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार 
  • तासभरात २०० ते २४० मिलिमीटर पावसाचा अंदाज 
  • आंबा, काजू, केळी, पपई, द्राक्षे, डाळींब, सिताफळ फळबांगाना धोका 
  • उभ्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता 
  • या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे. 

    कडकडणाऱ्या विजांपासून सावधान.... 

    विजा चमकत असताना घराबाहेर जाणे टाळावे. मात्र, अनेकदा आपण बाहेर असतानाच विजा चमकू लागतात आणि आपण अडकून बसतो. अशावेळी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. 

  • वाहते पाणी ः पाणी हे विद्युत वाहक आहे. वाहत्या पाण्यात किंवा ओल्या जागी थांबू नये. अशा काळी पाण्यासाठी हातपंप, वीजपंपाचा वापर करू नये. पोहण्याचे तलाव, विहिरीतदेखील उतरू नये. 
  • उंच झाडे ः पावसामुळे ओली झालेली झाडे ही असुरक्षित असतात. म्हणून विजा चमकताना झाडाखाली थांबू नये. झाडावर वीज कोसळली तर तेथे थांबणाऱ्या व्यक्तीला शॉक बसण्याची शक्यता असते. 
  • वादळी पाऊस आणि विजा चमकताना धातूचे शेड, बसस्टॉप,मोबाईल टॉवर्स, खेळाची मैदाने, शेती, टेकड्या, समुद्र किनारा अशा ठिकाणी शक्यतो थांबू नये. पक्की इमारत, घर, ऑफिस अशा कोरड्या ठिकाणी आसरा घ्यावा. अंगावर वीज कोसळण्याची शक्यता कमी करण्यासाठी खाली बसणे किंवा जमिनीवर सरळ लोटांगण घालणे हा उपाय उपयोगी ठरू शकतो. 
  • कानाची सुरक्षितता ः विजा पडताना गडगडाट ऐकू येतो. यातून निर्माण होणाऱ्या ‘एकॉस्टिक शॉक वेव्हज’ खिडकीला असलेली काचेची तावदाने या कंपनाने तुटण्याची शक्यता असते. तसेच आवाजामुळे कानाचा नाजूक पडदा दुखावण्याची शक्यता असते. त्यामुळे विजा चमकताना, गडगडाट होताना कानात बोटे घालून कानाच्या पडद्याचे संरक्षण करावे.   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com