पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनाऱ्यालगत मंगळवारी (ता.२) दुपारी १.४५ वाजता ‘निसर्ग’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, रात्री उशिरा या प्रणालीचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. किनारपट्टीलगत ताशी ११० ते १२५ किलोमीटर चक्राकार वारे वाहून हे ‘चक्रीवादळ’ आज (ता.३) दुपारपर्यंत हरिहरेश्वर व दमन दरम्यान जमिनीवर येणार असून, रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळ किनाऱ्याला धडकण्याचा, तसेच उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्र, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत मंगळवारी (ता.२) सकाळी कमी तीव्रतेचे वादळ (डीप डीप्रेशन) होते. त्याची तीव्रता वाढून दुपारी चक्रीवादळाची निर्मिती झाली. ही वादळी प्रणाली गोव्याच्या पणजीपासून वायव्यकडे २९० किलोमीटर, तर मुंबईपासून ३८० किलोमीटर, तर गुजरातच्या सुरतपासून ६०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे आहे. या कमी दाब क्षेत्राचे केंद्र ताशी ११ किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. रात्री उशिरापर्यंत अरबी समुद्रात तीव्र चक्रीवादळ घोंगावणार असून, ते महाराष्ट्र व गुजरातच्या किनाऱ्याकडे येणार आहे.
या वादळामुळे आज (ता.३) महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत रायगड, मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात ताशी ११० ते १२० किलोमीटर वेगाने, तर गुजरातच्या वलसाड, नवसारीसह दमण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी ९० ते १०० वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र, गुजरात, गोवा किनाऱ्यालगत समुद्रात १ ते २ मीटर उंच लाट उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीलगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
या वादळामुळे किनारपट्टीलगतची कच्ची घरे, घरांची छपरे, पत्रे उडून जाण्याची, वीजेचे आणि टेलीफोनचे लाईन, कच्चे, पक्के रस्ते खराब होण्याचे, तसेच रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता आहे. तर झाडांच्या फांद्या, केळी, पपईच्या बागा, किनारपट्टीय भागातील पिकांना तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनारपट्टीय जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आज अतिवृष्टीचा इशारा मंगळवारी सायंकाळपासून किनाऱ्यावर जोरदार वारे वाहू लागले असून, आज (ता.३) कोकण, गोव्यात मुसळधार, तर उत्तर कर्नाटक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वादळ धडकताना उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात केवळ तासाभरात २०० ते २४० मिलिमीटर, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव,पुणे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण गुजरात दमण, दादरा नगर हवेली मध्ये जोरदार, मध्य प्रदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. असा होईल परिणाम...
या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे.
कडकडणाऱ्या विजांपासून सावधान....
विजा चमकत असताना घराबाहेर जाणे टाळावे. मात्र, अनेकदा आपण बाहेर असतानाच विजा चमकू लागतात आणि आपण अडकून बसतो. अशावेळी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.