युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच सेंद्रिय पॅटर्न यशस्वी: नितीन गडकरी

नितीन गडकरी
नितीन गडकरी

नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक वर्षांपासून होत असताना शेतकऱ्यांमध्ये अद्याप माती आणि परीक्षणाप्रती अपेक्षित जागरूकता नाही. माती आणि पाणी परीक्षणाकरिता जागरूकता वाढविण्यासोबतच युरियाशिवाय शेती हा विचार शेतकऱ्यांमध्ये रुजला तरच सेंद्रिय शेतीचा पॅटर्न देशात रुजेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केला.  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत तीनदिवसीय जागतिक सेंद्रिय परिषदेचे उद्‍घाटन रविवारी (ता. १५) केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते हॉटेल लि-मेरिडियन येथे पार पडले. या वेळी ते बोलत होते. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे, डॉ. सी. डी. मायी, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक डॉ. एस. के. चौधरी, कुलगुरू डॉ. विलास भाले, जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे, ‘माफसू’चे कुलगुरू डॉ. आशिश पातूरकर, वनामतीचे संचालक रवींद्र ठाकरे यांची या वेळी उपस्थिती होती.  श्री. गडकरी म्हणाले की, सर्व प्रकारच्या शेतमालाचे अतिरिक्‍त उत्पादन देशात होते. परंतू खाद्यतेलाची ७० टक्‍के आयात देशाला करावी लागते. त्यामुळे खाद्यतेल उत्पादनवाढीवर भर देण्याची गरज आहे. या माध्यमातून देशातून बाहेर जाणारा पैसा वाचणार आहे. सात कोटींची आयात होते. यातील दोन कोटी रुपयांची जरी बचत झाली तर देशाची आर्थिक स्थिती काही अंशी सुधारेल. ओमानवरून युरियाकरिता गॅस विकत घेतला जातो, हाच गॅस रशियावरून घेतल्यास स्वस्त पडणार आहे. त्या माध्यमातून युरियाकरीता अनुदानाचीदेखील गरज भासणार नाही. सध्या २५ हजार टन युरियाची गरज पडते. भविष्यात युरियाशिवाय शेतीचा विचार केला पाहिजे. त्याकरीता कमी खर्चाच्या शेतीपद्धतीचे मॉडेल विकसित करण्याची गरज आहे. नेपीयर गवतापासून अपारंपरिक ऊर्जा तयार करण्याचा पथदर्शी प्रकल्प प्रस्तावीत असल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली.  ‘‘आयातीला पर्याय शोधला तरच भारतीय शेती फायद्याची होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी सेंद्रिय कर्ब वाढविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. पूर्वी विदर्भात उसाची उत्पादकता जेमतेम होती. सेंद्रिय कर्ब वाढल्याने पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणे ऊस उत्पादकता मिळविण्यात यश आले आहे,’’ असेही मंत्री गडकरी म्हणाले. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले की, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांत मोनोक्रोटोफास सर्वाधिक विकल्या जात असल्याचे सांगितले. स्वस्त मिळते म्हणून त्याचा वापर होतो. परंतू त्याचे दुष्परिणाम दुर्लक्षित केल्या जातात. रासायनिक शेतीइतकेच उत्पादन आणि उत्पन्न मिळेल असा सक्षम पर्याय दिला तरच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील. त्याकरिता संशोधनाची दिशा विद्यापीठांनी निश्‍चित करावी. कृषी विभागाकडून निंबोळी वापराला प्रोत्साहन मिळावे याकरीता निमपार्क प्रस्तावीत करण्यात आला आहे. पाच हजार हेक्‍टरवर कडुलिंबाच्या झाडांची लागवड याद्वारे केली जाणार आहे. कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी केले. सूत्रसंचालन निंबार्ते यांनी  केले, तर प्रा. एस. आर. पोटदुखे यांनी आभार मानले.  अंबानींना घातली पाटलांच्या सीताफळाने भुरळ वर्धा जिल्ह्यातील पाटील नामक शेतकरी जैविक सीताफळ उत्पादन घेतात. मुकेश अंबानी नागपुरात आले असताना त्यांच्या बागेतील सीताफळ अंबानी यांना भेट दिली. सीताफळाच्या चवीने मुकेश अंबानींना भुरळ घातली. आज त्यांच्याकडून या सिताफळांना दरवर्षी मागणी केली जाते, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com