आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे नोंद नाही ः तोमर

कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये ७०० शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे असले, तरी सरकारकडे याबाबतची कोणतीही नोंद नसल्याने त्यांना भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
No record of farmers killed in agitation: Tomar
No record of farmers killed in agitation: Tomar

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये ७०० शेतकरी मृत्युमुखी पडल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे असले, तरी सरकारकडे याबाबतची कोणतीही नोंद नसल्याने त्यांना भरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज लोकसभेमध्ये यासंदर्भातील लेखी प्रश्नाच्या उत्तरात सरकारची भूमिका स्पष्ट केली. 

शेतकरी आंदोलनाबाबत लोकसभेमध्ये राजीव रंजन सिंह (संयुक्त जनता दल), टी. एन. प्रतापन (काँग्रेस), एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी), ए. एम. आरीफ (माकप), अॅन्टो अॅन्टोनी (काँग्रेस), डी. कुरियाकोस (काँग्रेस), प्रा. सौगत रॉय (तृणमूल काँग्रेस), अब्दुल खालेक (काँग्रेस) या खासदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. या आंदोलनामध्ये बळी गेलेल्या शेतकऱ्यांचा तपशील मागताना त्यांच्या वारसांना आर्थिक मदत करण्याचा सरकारचा विचार आहे काय, अशी विचारणा या खासदारांनी केली होती. 

कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी स्पष्ट केले, की कृषी कायदे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे याबाबतची कोणतीही नोंद नाही. त्यामुळे मदतीचा प्रश्नच उद्‌भवत नाही. कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक २९ नोव्हेंबरला मंजूर झाले असल्याचे सांगताना कृषिमंत्र्यांनी कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशींनुसार २२ पिकांना सरकारतर्फे किमान आधारभूत किंमत दिली जाते, असे सांगितले. तसेच वेगवेगळ्या हस्तक्षेप योजनांद्वारे शेतकऱ्यांना लाभकारी मूल्यही दिले जात असल्याचे या उत्तरात स्पष्ट केले. 

केंद्र सरकारने कायदे रद्द केल्यानंतर आता शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना आर्थिक मदतीची मागणी सुरू झाली आहे. शेतकरी संघटनांनी आता एमएसपीला कायदेशीर हमी, प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयक रद्द करणे यांसारख्या मागण्यांबरोबरच दिवंगत शेतकऱ्यांचे स्मारक उभारण्यासाठी सरकारने जागा द्यावी, अशीही मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. तर या आंदोलनात ७०० शेतकऱ्यांचा बळी गेला असल्याने या शेतकऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी काँग्रेसने सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनीही कृषी कायदे रद्द झाल्यानंतर या मागणीसाठी सरकारला लक्ष्य केले होते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com