मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य भागात ‘निवार’ चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढत असल्याने त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांवर होणार आहे.
Hawaman
Hawaman

पुणे ः बंगालच्या उपसागराच्या नैर्ऋत्य भागात ‘निवार’ चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याची तीव्रता वाढत असल्याने त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांवर होणार आहे. यामुळे राज्यातील अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण आहे. यामुळे आज (ता.२५) भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया येथे तुरळक ठिकाणी मेघगर्नजेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दक्षिण भारतालगतच्या समुद्रात वादळामागून वादळांची साखळी सुरू आहे. अरबी समुद्रात आलेले ‘गती’ चक्रीवादळ निवळते तोच बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत मंगळवारी (ता.२४) नव्याने चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यातच ईशान्य मोसमी वारे (ईशान्य मॉन्सून) सक्रिय असल्याने दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. यातच पूर्वेकडील वाऱ्यांमुळे राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळे निर्माण झाल्याने राज्यात अद्यापही थंडीची प्रतीक्षा आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निवळल्याने थंडीत वाढ झाली असली, तरी दुपारी उन्हाचा चटका वाढून उकाड्यातही वाढ झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ हे पुद्दुचेरीपासून ४१० किलोमीटर, तर चेन्नईपासून ४५० किलोमीटर अग्नेयेकडे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. मंगळवारी सकाळपर्यंत (ता.२४) या भागात चक्रीवादळ तयार होऊन त्याची तीव्रता वाढली आहे. ही वादळीप्रणाली पूर्व किनारपट्टीकडे झेपावत असून, बुधवारी (ता. २५) दुपारपर्यंत तमिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या कराईकल आणि ममल्लापूरमलगत किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू राज्यात पावासाचा फटका बसणार आहे. फळबागा आणि किनाऱ्यालगतच्या शेती पिकांचे नुकसान होणार आहे. किनाऱ्यावरही उंच लाटा उसळून, समुद्र खवळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. या वादळीप्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांत पावसाला पोषक हवामान होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील ही वादळीप्रणाली निवळल्यानंतर श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यालगत नवीन कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.  मंगळवारी (ता.२४) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान. (अंश सेल्सिअस)ः मुंबई (सांताक्रूझ) २०.६, अलिबाग २०.८ (१), ठाणे २४.२, रत्नागिरी २२.१ (१), डहाणू २०.२, पुणे १७.५ (४), जळगाव १९.६ (७), कोल्हापूर १९.५ (३), महाबळेश्‍वर १६.२ (२), मालेगाव १९.२ (६), नाशिक १६.८ (५), निफाड १७.०, सांगली २०.३ (४), सातारा १९.० (४), सोलापूर १९.१ (२), औरंगाबाद १६.६ (३), परभणी १५.५ (१), परभणी कृषी विद्यापीठ १३.८, नांदेड १४, उस्मानाबाद १८.० (४), अकोला १६.१ (१), अमरावती १३.३ (-३), बुलडाणा १६.६ (१), चंद्रपूर १६ (१), गोंदिया ११.६ (-४), नागपूर १३.५ (-१), वर्धा १४.६ (-१), यवतमाळ १६.  येथे होणार पाऊस  बुधवार ः भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया.  गुरुवार ः सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर,  गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.  शुक्रवार ः सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com