कृष्णा-भीमा नव्हे, नीरा-भीमा स्थिरीकरणाचे काम सुरु : मोहिते पाटील

सोलापूर ः सध्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे नव्हे, तर नीरा-भीमा स्थिरीकरणाचे काम सुरू असल्याचे भाजप नेते धैर्यशील मोहिते यांनी सांगितले.
 Not Krishna-Bhima, Nira-Bhima stabilization work started: Mohite Patil
Not Krishna-Bhima, Nira-Bhima stabilization work started: Mohite Patil

सोलापूर  ः कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसंदर्भात महाविकास आघाडी सरकारकडून दिशाभूल होत आहे. सहा टप्प्यांच्या या योजनेतील शेवटच्या दोन टप्प्यांचे काम सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या चार टप्प्यांत काय काम केले? याची माहिती सरकारने द्यावी. सध्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे नव्हे, तर नीरा-भीमा स्थिरीकरणाचे काम सुरू असल्याचे भाजप नेते धैर्यशील मोहिते यांनी सांगितले. 

कृष्णा-भीमा स्थिरीकरणाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करतो आहोत. त्याचा पाठपुरावा सुरु आहे. पण, याच योजनेचा एक भाग असलेल्या नीरा-भीमा स्थिरीकरणाचे सध्या काम सुरु आहे. पण, त्याचा संबंध मूळ योजनेला जोडून काम सुरु केल्याबाबत प्रचार केला जातो आहे, यावर पाटील यांनी स्पष्टिकरण दिले.

पाटील म्हणाले, ‘‘पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील सहा जिल्हे आणि तालुक्‍यांतील ४५००  हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी  तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांनी कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजना मंजूर करून घेतली. तत्कालीन कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने व सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने या योजनेचे गांभीर्य न बाळगता राजकारण केले.’’ 

‘‘वेगवेगळ्या सहा टप्प्यांमध्ये हे पाणी पश्‍चिम महाराष्ट्रातून अगदी मराठवाड्यापर्यंत नेण्याची योजना आहे. यातून मराठवाड्याला २१ टीएमसी पाणी द्यायचे आहे. सध्या बारामती तालुक्‍यातील उद्धट येथे नीरा नदी अडवून बोगद्यातून नीरेचे सहा टीएमसी पाणी उजनीत टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पुढे हे पाणी उजनीतून उचलून मराठवाड्याला देण्यात येणार आहे,’’ असे पाटील म्हणाले.

‘‘कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे पहिले चार टप्पे बंद ठेवून शेवटच्या दोन टप्प्यांच्या कामांना सुरुवात केली आहे. त्याला कृष्णा-भीमा स्थिरीकरण म्हणून राजकारण केले जात आहे. यातून कृष्णेचा एक थेंबही येथे येणार नाही. प्रत्यक्षात हे काम नीरा-भीमा स्थिरीकरणाचे असल्याचेही  मोहिते पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नात राजकारण नको

कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही मूळ योजना ११५ टीएमसीची आहे. या योजनेतून सात टीएमसी पाणी अन्यत्र वळवण्यासाठी हालचाली आहेत. काही मंडळी आपल्या स्वार्थासाठी यामध्ये राजकारण करत दिशाभूल करत आहेत. पण, आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नात असे राजकारण करु नका, असेही मोहिते पाटील म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com