फवारणीदरम्यान विषबाधितांची संख्या पाचशेपार

फवारणीदरम्यान विषबाधितांची संख्या पाचशेपार
फवारणीदरम्यान विषबाधितांची संख्या पाचशेपार

नागपूर ः फवारणीदरम्यान होणारा विषबाधा व्यापक जागृतीमुळे नियंत्रणात असल्याचा दावा केला जात असला तरी, या हंगामात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात बाधितांची संख्या सुमारे १३४ वर पोचली आहे. त्यासोबतच दोघांचा मृत्यू झाला असला तरी, शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असल्याने त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण अस्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे. 

अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी कापसावरील बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून शिफारसीत नसलेल्या कीडनाशकांची एकत्रित फवारणी करण्यात आली होती. उसावर फवारण्यात येणाऱ्या कीडनाशकाचादेखील त्यामध्ये समावेश होता. त्यासोबतच फवारणीच्या वेळी संरक्षक साधनांचा वापरदेखील दुर्लक्षित केला गेला. या साऱ्या कारणांमुळे जिल्ह्यात विषबाधित शेतकरी, शेतमजुरांची संख्या वाढीस लागली होती. 

एकट्या यवतमाळ जिल्ह्यात हा आकडा एक हजाराच्या वर होता, तर २२ जणांचा मृत्यूदेखील या घटनांमध्ये झाला होता. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाकडून व्यापक जागृतीसाठी पुढाकार घेण्यात आला. त्यामुळे गेल्या वर्षी परिस्थिती नियंत्रणात होती. 

या वर्षी पुन्हा फवारणीदरम्यान विषबाधांच्या घटनांनी डोके वर काढले आहे. यवतमाळ जिल्ह्यात १३४ जणांवर उपचार करण्यात आले. त्यामध्ये ११२ बाधित हे यवतमाळ जिल्ह्यातील तर उर्वरित लगतच्या नांदेड, हिंगोली आणि वाशीम जिल्ह्यांतील असल्याचे सूत्रांनी सांगितले. नेर आणि आर्णी येथील दोघांचा मृत्यू झाला; मात्र त्यांचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू विषबाधेमुळेच झाल्याचे खात्रीशीर सांगता येत नसल्याचा दावा यंत्रणांनी केला आहे. 

दरम्यान, पूर्वीच्या अनुभवामुळे यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १० बेडचा आयसीयू कार्यान्वित करण्यात आला आहे.  फवारणी बाधितांवर या ठिकाणी विशेष उपचार केले जातात. त्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीमही नियुक्‍त करण्यात आली आहे. त्यासोबतच मंगळवारी (ता. २४) कृषी विकास अधिकारी बरडे यांनी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र संचालकांची बैठक घेत त्यांना बंदी असलेल्या कीडनाशकांची विक्री न करण्याची ताकीद दिली.

नागपूर विभागात दोघांचा मृत्यू  अकोला जिल्ह्यात बाधितांचा आकडा दोनशेपार गेला आहे. नागपूर विभागातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांत फवारणीदरम्यान विषबाधेमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. परंतु त्यांचेदेखील व्हिसेरा आणि शवविच्छेदन अहवाल बाकी आहेत. त्यामुळे त्यांच्या मृत्यूबाबतही कृषी विभाग अस्पष्टता व्यक्‍त करीत आहे. नागपूर जिल्ह्यात मृत झालेला व्यक्‍ती हा ग्लायफोसेटची फवारणी करीत होता. परंतु, यापासून बाधा होत व्यक्‍ती दगावूच शकत नाही, असा दावादेखील कृषी विभागाने केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com