सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष कोकणातील आंबा, काजू उत्पादकांना मारक आहेत. त्यामुळे सन २०१८-१९ प्रमाणेच निकष लागू करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे दिली.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. सावंत यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली. आंबा, काजू उत्पादकांच्या विविध समस्यांबाबत श्री. सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
श्री. सावंत म्हणाले की, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या बदललेल्या निकषामुळे कोकणातील आंबा, काजू उत्पादक अडचणीत आले होते. नव्या निकषानुसार अवकाळी पाऊस किमान २५ मिलिमीटर, याशिवाय १३ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान किंवा ३७ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद, झाल्यास विमा परतावा मिळणार होता. परंतु हे निकष चुकीचे असल्याचे मुख्यमंत्र्याच्या निर्दशनास आणून देण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सन २०१८-१९ चे निकषच कायम करण्यात येतील, अशी ग्वाही दिली आहे.जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांना ५० कोटींचा विमा परतावा मिळेल, असे देखील श्री. सावंत यांनी स्पष्ट केले.
या शिवाय जिल्ह्यातील ७७७४ थकीत खावटी कर्जधारक शेतकऱ्यांना १२ कोटी ७४ लाख रुपये शासनाकडून येणे आहेत. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांनी देखील परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्याचे आदेश सहकार विभागाला दिले असल्याचे श्री. सावंत यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.