यवतमाळ : जिल्ह्यात उगवणविषयक तब्बल १५०० पेक्षा अधिक तक्रारी करण्यात आल्या आहेत. यातील अर्ध्या अधिक तक्रारींच्या पडताळणीचे कामही झाले आहे. आता शेतकऱ्यांच्या नजरा भरपाईकडे लागले आहेत.
जिल्ह्यात सुमारे पावणेपाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. गेल्या हंगामातील कापूस विकताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, कापसाखालील क्षेत्र कमी होऊन ते सोयाबीनकडे वळण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यातच कोरोनामुळे देखील शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.
अशा समस्या असतानाही शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करीत पेरणी आटोपली. परंतु, निकृष्ट दर्जाचे बियाणे उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात आजवर सुमारे १५०० तक्रारींची नोंद झाली आहे. वणी तालुक्यात २७४, झरी तालुक्यात ३५० व मारेगाव तालुक्यात ३० शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. कृषी विभागाकडून यातील बहुतांश तक्रारींची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आता संबंधित बियाणे कंपनीशी चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांना बियाणे व मजूरीचा खर्च द्यावा, असा आग्रह प्रशासनाचा आहे.
या विषयीची बोलणी सकारात्मक पातळीवर असल्याचे सांगितले जाते. परंतु, ही भरपाई नेमकी कधी आणि कशा स्वरुपात मिळणार, याबाबत मात्र अनिश्चितता आहे. दुबार पेरणीपूर्वीच याबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.