सातारा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १४२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे संबंधित विभागांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली.
अंबवडे बुद्रुकमध्ये (ता. सातारा) अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातपिकाची पालकमंत्री पाटील यांनी गुरूवारी (ता. १५) पाहणी केली. त्यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत उपस्थित होते. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कृषी विभागाच्या प्राथमिक नजर अंदाजानुसार सातारा तालुक्यातील भात, सोयाबीन व भुईमूग- ६० हेक्टर, कोरेगाव तालुक्यातील सोयाबीन, भाजीपाला व आले- १२० हेक्टर, खटाव तालुक्यातील बटाटा, कांदा- ७० हेक्टर, कऱ्हाडमधील भात, ज्वारी- २० हेक्टर, पाटण तालुक्यातील भात- २०० हेक्टर, खंडाळा तालुक्यातील भाजीपाला- ५ हेक्टर, वाई तालुक्यातील भात, सोयाबीन व भाजीपाला- १५ हेक्टर, महाबळेश्वर तालुक्यातील भात- ३० हेक्टर, फलटण तालुक्यातील भाजीपाला, मका व ज्वारी- ३९० हेक्टर, माण तालुक्यातील ज्वारी व मका- ५१० हेक्टर असे एकूण एक हजार ४२० क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांतून सध्या पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच हवामान खात्याने पुढील काही दिवसांत बहुतेक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.