जनावरांसह शेतकरी करणार सोमवारी एक दिवसाचा अन्नत्याग

चारा छावणी
चारा छावणी

नगर ः दुष्काळाची दाहकता अधिक वाढत असताना जनावरे जगविण्यासाठी छावण्या सुरू केल्या. प्रशासन मात्र चारा छावण्याला मान्यता द्यायला उशीर करत आहे. त्यामुळे उद्या सोमवारी (ता.११) पाथर्डी तालुक्यात लोकसहभागातून सुरू केलेल्या खोजेवाडी व भोसे, वैजुबाभूळगाव येथील जनावरांच्या छावण्यांत जनावरांसह शेतकरी एक दिवसाचा अन्नत्याग करणार आहेत.  नगर जिल्ह्याच्या सर्वच भागांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, कर्जत भागात तर चारा मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे जनावरे जगवताना शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. सरकार काहीच करत नसल्याने पाथर्डी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन खोजेवाडी व भोसे, वैजुबाभूळगाव येथे लोकसहभागातून जनावरांच्या छावण्या सुूर केल्या. दीड- दोन महिन्यांपासून केवळ लोकमदतीवर या छावण्या सुरू आहेत. सध्या दोन्ही छावण्यांत सुमारे पाचशेच्या जवळपास जनावरे आहेत.  सरकारने फक्त दुष्काळ जाहीर केला. जनावरे जगवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर अडीच महिन्यांनी छावण्या सुरू करणार असल्याचे सांगितले. आता प्रस्ताव मागवत आहेत. मात्र छावण्या लवकर सुरू करण्याबाबत प्रयत्नच केले जात नसल्याचा आरोप केला जात आहे. प्रशसानाची चाल पाहता अजून किमान पंधरा दिवस छावण्याला मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. जेथे गरज आहे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने शासनाला शेतकऱ्यांना आधार द्यायचा नाही, असेच दिसत आहे.  आम्ही आमच्या परीने उपाययोजना शोधत असताना प्रशासन मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या कारभाराचा निषेध म्हणून सोमवारी (ता. ११) लोकसहभागाने सुरू असलेल्या खोजेवाडी व भोसे, वैजुबाभूळगाव येथील जनावरांच्या छावण्यांत जनावरांसह शेतकऱी एक दिवसाचा अन्नत्याग करणार आहेत, असे छावणीचालक शरद मरकड व साईनाथ घोपडे यांनी सांगितले. 

अटींमुळे अडचण नगर जिल्ह्याच्या सर्वच भागांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांना पाणी मिळवणेही अवघड झाले आहे. प्रशासनाने छावण्या सुरू करण्यासाठी संस्था, कारखान्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. त्यातील काही अटींमुळे संस्थांची अडचण ठरत आहेत.  ...तर पालकमंत्र्यांच्या दारात जनावरे शेतकऱ्यांची जनावरे जगावीत, यासाठी काहीच उपायोजना केल्या जात नाहीत. छावण्यांसाठी प्रस्ताव देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सोमवारी आम्ही जनावरांसह शेतकरी अन्नत्याग करणार आहोतच, पण त्यानंतरही दखल घेतली नाही तर मात्र गुरुवार ता. १४ नंतर कधीही पालकमंत्री राम शिंदे यांच्या दारात जनावरे बांधू, असे शरद मरकड व साईनाथ घोरपडे यांनी सांगितले. शेतकरी संघर्ष समितीने प्रशासनाला याबाबत निवेदन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com