पावसामुळे पुणे विभागात सव्वालाखावर हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पावसामुळे बाजरी पिकाचे झालेले नुकसान
पावसामुळे बाजरी पिकाचे झालेले नुकसान

पुणे  : गेल्या आठ दिवसांत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुणे विभागातील सुमारे एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेगाने करण्याचे आदेश दिले असून येत्या पाच दिवसांत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे विभागात झालेल्या पिकांच्या नुकसानीसंदर्भात रविवारी येथील विभागीय आयुक्तलयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, की गेले दोन दिवस सोलापूर व सांगली जिल्ह्याचा दौरा केला. नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. विभागातील सांगली जिल्ह्यात ६५ हजार २६७, सोलापूर जिल्ह्यात ३६ हजार ३४५, पुणे जिल्ह्यात २१ हजार ६८०, सातारा जिल्ह्यात ११ हजार ८००  व कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार ५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने सोयाबीन, भात, ज्वारी, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

विभागातील ५१ तालुके बाधित पुणे विभागात एकूण ५१ तालुके बाधित असून, एक लाख ३६ हजार १४८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यांतील काही भागांतील गावांना भेटी देत आपण पाहणी केली असून, या सर्व भागांमध्ये पंचनामे करण्याचे काम सुरू असून, पुन्हा पाऊस आला नाही तर हे पंचनामे येत्या ५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील. हे पंचनामे करीत असताना जिओ टॅगिंग फोटो काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. किती क्षेत्र बाधित झाले आहे, याबाबत माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या पिकाचा विमा काढलेला आहे, त्याबाबतही आम्ही वेगळी माहिती घेऊन त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून घेत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकऱ्याला विमा कंपनी किंवा शासनाकडून मदत केली जाणार आहे. याकरिता सर्व विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली आहे. पुणे विभागात रविवार अखेर सरासरी १३७.२४ टक्के पाऊस झाला असून, सर्वाधिक १८२.५ टक्के पाऊस सांगली जिल्ह्यात झाला आहे. पुणे जिल्ह्यात १५८.५, सातारा जिल्ह्यात १७०.८६, सोलापूर जिल्ह्यात ९१.७५, तर कोल्हापूर जिल्ह्यात १२०.२४ टक्के पाऊस झाला आहे.

पावसामुळे झालेले नुकसानीचे क्षेत्र कमी दिसत असले तरी गेल्या महिन्यात झालेल्या सांगली, कोल्हापूर, सातारा भागात झालेल्या पावसामुळे सुमारे एक लाख ८९ हजार १४८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विभागात एकूण दोन महिन्यांत झालेल्या नुकसानीचे क्षेत्र हे मोठे आहे. विभागात ३३ हजार १८० हेक्टरवरील ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ भात, बाजरी, मका, भूईमूग, सोयाबीन, तूर, भाजीपाला, फळांचे मोठे नुकसान झाले आहे, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com