सोलापूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा नजर अंदाज अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठवला जाणार आहे.
या आपत्तीमध्ये २१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. २५ हजार ४९० लहान-मोठी जनावरे वाहून गेली आहेत. तर, सात हजार ९८३ घरांची पडझड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल आता शासनाकडे जाणार आहे. या नुकसानीसाठी प्रशासन सव्वादोनशे कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचं सांगण्यात आले.
उजनी आणि वीर धरणातून एकावेळी सुमारे अडीच लाख क्युसेकहून अधिक विसर्ग सोडण्यात आला. त्याचा पंढरपूरसह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, माढा, मोहोळच्या काही भागाला मोठा फटका बसला. त्यातच मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे शेतीसह मनुष्य व पशुधनाची हानी झाली. सध्या महसूल आणि कृषी विभागाकडून संयुक्तपणे पंचनाम्याचे काम सुरु आहे.
सध्या हे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या दोन दिवसांत हा अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून मदतीची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होईल. ही रक्कम तालुकानिहाय वितरित केली जाईल. त्यासाठी सव्वादोनशे कोटी रुपयांची मागणी केली जाणार आहे. त्यानंतर नुकसानग्रस्तांच्या बॅक खात्यांत भरपाईची रक्कम वितरित केली जाईल, असेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
तालुकानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
पंढरपूर - २९ हजार ९४३, बार्शी - २२ हजार ६९०, मोहोळ - १८ हजार १८६, द. सोलापूर - १८ हजार ६९, सांगोला - १७ हजार ३४४, अक्कलकोट - १६ हजार १७९, करमाळा - १४ हजार ६६४, माळशिरस - ११ हजार १४५, माढा - नऊ हजार ४४५, मंगळवेढा - आठ हजार ३४५, उत्तर सोलापूर - सहा हजार ८०६, (एकूण - एक लाख ७२ हजार ८१७)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.