नांदेड : ऑक्टोबर महिन्यात सलग आठ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील एक लाख दहा हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज आहे. जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी (ता. १६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत झालेल्या दूरचित्रवाणी संदेश प्रणालीव्दारे (व्हीसी) माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे सोळा तालुक्यातील पाच लाख ६३ हजार ७२ शेतकऱ्यांना फटका बसला होता. यात तीन लाख ६१ हजार १२८ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, ज्वारी या हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या ‘एनडीआरएफ’च्या निकषांनुसार २४६ कोटी ३७ लाख २९ हजार २५६ रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे केली.
दरम्यान, ऑक्टोबरमध्येही सतत आठ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे उभे तसेच कापणी केलेले सोयाबीन, वेचणीसाठी आलेला कापूस, ज्वारी व तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीच्या माध्यमातून शुक्रवारी सर्व जिल्ह्यातील आढावा घेतला.
जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक नजर अंदाज शासनाला कळविला. ऑक्टोबरनंतर जिल्ह्यातील नुकसानीचे चित्र स्पष्ट होइल, अशी माहिती यावेळी सूत्रांनी दिली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.