राज्यातील चारा छावण्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

चारा छावणी
चारा छावणी

मुंबई ः राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांना आणखी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. ३०) घेतला आहे. 

मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न अजूनही कायम आहे.  या दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने जनावरांच्या चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला. मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागणार आहे. तसेच अद्यापही मराठवाडा आणि इतर दुष्काळी जिल्ह्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने यापूर्वी १ ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर ३० ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही राज्याच्या काही भागांत मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने चारा छावण्यांची मुदत वाढविण्याची मागणी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. त्यातच आज (ता. ३१) चारा छावणीची शेवटची मुदत असल्याने शेतकरी चिंतेत होते. त्यामुळे चारा छावणीची मुदत पुन्हा वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यात दुष्काळी भागात जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांची मुदत आता आणखी महिनाभर म्हणजेच, ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.  बुधवारी (ता. २८) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली होती, त्यानुसार शासनाने शुक्रवारी, (ता. ३०) तसा शासन निर्णय जारी केला आहे. गरजेनुसार चारा छावण्या सुरू अथवा बंद करण्याचा अधिकार राज्य शासनाने स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चाऱ्याची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून जिल्हाधिकारी वेळोवेळी छावण्यांबाबतचा निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.  दरम्यान, कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही भागाला महापुराचा मोठा फटका बसला आहे. पूरपरिस्थितीमुळे या भागात चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी पूरबाधित शेतकऱ्यांमधून पुढे येत आहे. कोल्हापुरात पूरग्रस्तांनी काढलेल्या आक्रोश मोर्चाद्वारेसुद्धा ही मागणी करण्यात आली आहे. १,५८३ चारा छावण्या सुरू राज्यात सध्या १,५८३ चारा छावण्या सुरू असून, त्यामध्ये लहान व मोठी अशी एकूण सुमारे साडेदहा लाखांहून अधिक जनावरे आहेत. छावण्यांमधील मोठ्या जनावरांना प्रतिदिन १०० रुपये आणि लहान जनावरांना ५० रुपये अनुदान दिले जाते. चारा छावण्यांना आतापर्यंत ३९२ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com