कांदा दरप्रश्नी पंतप्रधानांना साकडे

नाशिक जिल्ह्यातील शिष्टमंडळांने दिले मागण्यांचे निवेदन
नाशिक जिल्ह्यातील शिष्टमंडळांने दिले मागण्यांचे निवेदन

नाशिक : कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळण्यासाठी शासनाने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे अथवा बाजार हस्तक्षेप योजना राबवावी, निर्यातीवरील प्रोत्साहन भत्ता १० टक्के करावा. तसेच देशांतर्गत वाहतुकीस प्रोत्साहन मिळण्यासाठी अनुदान देण्यात यावे, या मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील शिष्टमंडळाने नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असून उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला दिले. या वेळी पंतप्रधानांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सकारात्मक असून, लवकरच कांदा प्रश्न मार्गी लावण्याबाबत माहिती घेऊन उपाययोजना करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले. सध्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याबरोबर लाल कांद्याची विक्री होत असून, उन्हाळ कांद्यापाठोपाठ लाल कांद्यालाही मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्यास हमीभाव नसल्याने सद्यःस्थितीत नवीन लाल कांद्यास ५०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत असून, उन्हाळ कांद्यास १०० ते २०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. कांद्यास मिळणाऱ्या दरातून मजुरीदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केंद्र सरकारने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने पंतप्रधानांकडे केली. कांद्याला कमी बाजारभाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले कर्जदेखील परतफेड करणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नसल्याने याबाबत सरकारने सकारात्मक पावले उचलून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणीही करण्यात आली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, आमदार राहुल अहेर यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळात जयदत्त होळकर, भूषण कासलीवाल, चांदवड पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, ललित दरेकर, विलास ढोमसे, अमोल भालेराव, अभिजित देशमाने, नितीन मोगल यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांना राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचीही मागणी केली. शिष्टमंडळाने केलेल्या प्रमुख मागण्या 

  •  निर्यात प्रोत्साहन भत्ता १० टक्के करण्यात यावा.
  •  शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान थेट बँक खात्यात देण्यात यावे.
  •  ज्या शेतकऱ्यांनी मागील २ महिन्यांमध्ये कमी भावाने कांदा विक्री केला आहे त्यांना अनुदानास पात्र ठरवावे.
  •  दुष्काळामुळे ज्या शेतकऱ्यांचे कांदा पीक वाया गेले आहे किंवा करपले आहे, त्यांना नुकसानभरपाई द्यावी.
  •  दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. देशांतर्गत वाहतूक अनुदान उपलब्ध करून द्यावे.
  •  हमीभाव जाहीर करून त्यानुसार शासनाने कांदा खरेदी करावा.
  •  इतर शेतमालाप्रमाणे कांदा खरेदीदारांना ट्रान्झिट सबसिडी देण्यात यावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com