बुध, जि. सातारा ः खटाव, माण तालुक्यांचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा पिकाची लागवड करण्यात डिस्कळ, ललगुणसह बुध, परिसरातील शेतकरीवर्ग गुंतला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आगाप गरव्या कांद्याच्या लागवडीस प्रारंभ झाला. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा लागणी रखडल्या होत्या.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा कांदा लागणीस वेग आला आहे. कांद्याचे भाव वधारल्यामुळे कांदा पिकात फायदा होईल, या आशेने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. बाजारात कांदा लवकर विक्रीसाठी यावा, यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या काळात जवळचे सर्व कांदा बी रोपे तयार करण्यासाठी टाकले होते.
मात्र, पाऊस व खराब हवामानामुळे अनेक ठिकाणी उगवण व्यवस्थित झाली नाही. तर काही ठिकाणची रोपे नासून गेल्याने पुन्हा रोपे तयार करण्यासाठी शेतकरी खात्रीशीर कांदा बी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. यंदा सुरुवातीला बियाणाचे दर २००० रुपये होते. मात्र, आज दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिकिलो झाले असून, या दरातही मोठी टंचाई जाणवत आहे.
परिणामी यावर्षी कांदा लागवडीत गतवर्षीच्या तुलनेत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे नेर तलावासह विभागातील सर्व बंधारे भरले असून विहिरींनाही मुबलक पाणी उपलब्ध आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.