कांदा दरात एक हजारापर्यंत घसरण, शेतकरी संतप्त 

कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा घातल्या आहेत.
onion market
onion market

नाशिक: कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांवर साठा मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे सप्ताहअखेर कांदा दरात १ हजार रुपयांपर्यंत घसरण झाली. त्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. तर पूर्वी खरेदी केलेल्या कांद्याचा साठा असल्याने कारवाई नको म्हणून कांदा व्यापारी लिलावात सहभागी न झाल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांदा लिलाव बंद होते. 

शेतकऱ्यांकडील साठवलेला उन्हाळ कांदा जवळ जवळ संपुष्टात आला आहे. तर मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने दरात सुधारणा आहे. त्यात सरकारने निर्यातबंदीनंतर साठवणूक मर्यादा लादल्याने अनेक व्यापाऱ्यांनी कारवाईच्या भीतीपोटी कामकाज बंद ठेवले. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली. परिणामी, एकीकडे दरामुळे तर दुसरीकडे बाजार बंदचा फटका शेतकऱ्यांना बसला. या पार्श्वभूमीवर कांदा लिलाव तत्काळ सुरू व्हावेत, या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे व राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी निवेदन सादर केले.  कांदा लिलावाबाबत संभ्रम  काही बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी अर्ज दिले तर काही व्यापाऱ्यांनी तोंडी सांगून कांदा लिलाव बंद ठेवले. काही बाजार समित्यांनी सोशल मीडियावर कामकाज बंद राहील, असे संदेश फिरवले. त्यामुळे बाजार पडतील या भीतीने आवक नसल्याने काही ठिकाणी शुकशुकाट होता, तर काही ठिकाणी कांदा आवक होऊनही लिलाव झाले नाहीत. लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराणे, नामपूर, देवळा, मनमाड, चांदवड, कळवण, येवला, सिन्नरमध्ये लिलाव बंद होते. याबाबत जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना संपर्क साधला असता संबंधित तालुक्यातील बाजार समित्यांची माहिती सहायक निबंधक यांच्याकडून मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया  केंद्र सरकार दुतोंडी आहे. नुकत्याच आणलेल्या कृषी कायद्यात मूल्य साखळीत साठा मर्यादा नाही, असा नियम आहे. मग आता मर्यादा का? व्यापारी अडचणीत आले की त्याचा तोटा शेतकऱ्यांना होतो. भाव पडतात. म्हणून व्यापाऱ्यांची मागणी योग्य असली, तरी त्यांनी मार्केट बंद ठेवण्याची घेतलेली भूमिका चुकीची आहे. शासनाने यात तत्काळ हस्तक्षेप करावा, अन्यथा शेतकरी संकटात येतील.  - संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना  कांदा अत्यावश्यक वस्तूतून वगळल्याचा कांगावा केला खरा, पण आता तथाकथित कायदेशीर मार्गांनी कायदा मोडण्यासाठी केंद्र सरकार रोज नवी खेळी करत आहे. व्यापाऱ्यांनी बेकायदेशीर बंद पुकारला असून, ऐन दिवाळीच्या सणात शेतकरी मात्र भरडला जातोय. सरकार भानावर आले नाही आणि लिलाव प्रक्रिया सुरू झाली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू.  - हंसराज वडघुले, अध्यक्ष, संघर्ष शेतकरी संघटना   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com