कांदा बीजोत्पादनात कंपन्याच मालामाल 

खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत कांदा बीजोत्पादनासंबंधीचे करार करून बियाण्याची उपलब्धता करून घेतली आहे.
onion
onion

जळगाव : खानदेशात अनेक कांदा बियाणे निर्मात्या कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत कांदा बीजोत्पादनासंबंधीचे करार करून बियाण्याची उपलब्धता करून घेतली आहे. यात कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून बियाणे ३८०, ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलो या दरात खरेदी केले आणि याच बियाण्याची बाजारात तब्बल १२००, १५०० ते २००० रुपये प्रतिकिलोने विक्री केली जात आहे. कांदा बियाणे निर्मात्या, पुरवठादार कंपन्या मालामाल आणि शेतकरी उपाशी, अशी स्थिती यंदा आहे. 

बियाणे उगवणीची हमीदेखील कंपन्या देत नाहीत. गेल्या वर्षी बियाणे उगवण क्षमतेच्या अनेक तक्रारी होत्या, पण एकाही शेतकऱ्याला यासंबंधीची भरपाई कांदा बियाणे कंपनीकडून मिळाली नाही. यंदाही तशीच स्थिती आहे. कांदा लागवडीची तयारी शेतकरी खानदेशात करीत आहेत. याच वेळी बियाणे कंपन्या आपल्या नफ्याची गणिते, आडाखे बांधून मोकळ्या झाल्या आहेत. यंदाही बियाणे चढ्या दरात शेतकऱ्यांना मिळत आहे. बियाणे दरांवर नियंत्रण असायला हवे आणि त्याची उगवणक्षमता, गुणवत्ता याची हमीदेखील शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना मिळायला हवी, अन्यथा कांदा बियाणे कंपन्यादेखील सोयाबीन बियाणे कंपन्यांसारख्या मोकाट सुटतील, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.  खानदेशात कांदा बियाणे उत्पादक, पुरवठादार कंपन्यांनी शेतकऱ्यांसोबत बीजोत्पादनाचे करार केले होते. डिसेंबरमध्ये यासंबंधीची लागवड झाली होती. त्यात २० रुपये प्रतिकिलो या दरात कांदा बल्ब (बीजोत्पादनासाठी आवश्यक कांदा) पुरवठा शेतकऱ्यांना केला, तसेच मागणीनुसार कीडनाशके, खते पुरवठा केला. मळणीच्या वेळेस संबंधित कंपनीचे कर्मचारी संबंधित शेतात उपस्थित राहायचे. त्यांच्या निगरणातील बियाणे मळणी व इतर कार्यवाही केली जायची. शेतकरी आपले नुकसान करणार नाहीत, याची पूर्ण खबरदारी या कंपन्यांनी घेतली. 

बीजोत्पादकांची पिळवणूक  बियाणे उत्पादनासंबंधीच्या करार केलेल्या शेतकऱ्याकडून या बियाण्याची खरेदी ३८०, ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलो, या दरात संबंधित कंपन्यांनी केली. त्यात काही अलिखित शुल्कही (हिडन चर्जेस) आकारले. शेतकऱ्याला नेमके ३५० ते ३६० रुपये ते ४५० रुपये प्रतिकिलो या दरात हे बियाणे पडले. त्यात एकरी ४० ते ४५ हजार रुपये उत्पादन खर्चही आला. एकरी उत्पादन दीड ते दोन क्विंटल एवढेच आले. अर्थात एकरी ३० ते ३५ हजार रुपये नफा राहिला. पण कंपन्यांचे मात्र भले झाले आहे. कारण कंपन्या या बियाण्याची विक्री तब्बल १२००, १५०० ते २००० रुपये प्रतिकिलो या दरात बाजारात करून लूट करीत आहेत. या दरांवर नियंत्रण तातडीने नियंत्रण आणण्याची गरज आहे. 

गेल्या वर्षीची पुनरावृत्ती शक्य  गेल्या वर्षी रब्बीत तब्बल ३००० ते ३५०० रुपये प्रतिकिलो या दरात कांदा बियाण्याची विक्री कंपन्यांनी करून मोठा नफा मिळविला होता, हाच प्रकार पुढेही सुरू आहे. खानदेशात खरिपातील कांद्याची सुमारे १५ ते १६ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी स्थिती आहे. अर्थात, बियाणे बाजारात कोट्यवधींची उलाढाल होऊन अवाजवी नफा कंपन्यांच्या खिशात जाईल, असाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com