कांदा बीजोत्पादनाला हवे पीकविम्याचे कवच 

वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत हे क्षेत्र सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले असून, नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे यापैकी मोठ्या क्षेत्राला फटका बसला आहे.
onion seed damage
onion seed damage

अकोला ः नगदी पीक म्हणून शेतकरी दरवर्षी रब्बी हंगामात कांदा बीजोत्पादनाचे क्षेत्र वाढवीत आहेत. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत हे क्षेत्र सुमारे आठ ते नऊ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले असून, नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे यापैकी मोठ्या क्षेत्राला फटका बसला आहे. यामुळे पुन्हा एकदा या पिकाचा पीकविम्याच्या कार्यकक्षेत समावेश होण्याची मागणी पुढे आली आहे. 

खरिपातील पिकांचे गेल्या काही वर्षांत अर्थकारण बिघडलेले आहे. रब्बीतही गहू, हरभऱ्याशिवाय दुसरा चांगला पर्याय मिळालेला नाही. अशा स्थितीत शेतकरी पर्यायी पीक म्हणून कांदा लागवड, कांदा बीजोत्पादनास प्राधान्य देत आहेत. यंदाच्या हंगामात कांद्याचे दर वाढलेले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड, कांदा बीजोत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेतला. 

यंदाचे पीक चांगल्या स्थितीत असताना या भागात १८ मार्चपासून अवकाळी पावसाने ठाण मांडले. काही १८ व १९ मार्चला, तर वादळी वाऱ्यासह गारपीटसुद्धा झाली. या आपत्तीत सध्या बियाणे परिपक्व होण्याच्या अवस्थेत असलेल्या कांदा पिकाला सर्वाधिक तडाखा बसला. शेतकऱ्यांचा एकरी ४० हजारांपर्यंत सरासरी खर्च झालेला आहे. वादळी वारा व गारपिटीमुळे कांद्याची पात मोडून पडली. बियाण्याचे गेंद जमिनीवर आडवे झाले आहेत. यामुळे आता किती उत्पादन होईल, याची कुठलीही खात्री देता येत नाही. बुलडाणा जिल्‍ह्यात या भागात सर्वाधिक ५३०० हेक्टरवर कांदा बीजोत्पादन घेतले जात होते. तर अकोल्यातही हजार आणि वाशीममध्ये दीड हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा बीजोत्पादन होत आहे. हे पीक अत्यंत जोखमीच्या कक्षेत मोडते. यंदा असंख्य शेतकऱ्यांनी बियाणे कंपन्यांसोबत करार करून लागवड केली होती. कंपन्यांनी दरही चांगल्या प्रकारे दिले होते. परंतु आता उत्पादनच येण्याची आशा अनेकांना माळवल्याने लावलेला खर्चही कसा भागवावा याची चिंता लागलेली आहे.  प्रतिक्रिया  कांदा बीजोत्पादनासाठी एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च लागतो. मात्र हे पीक दरवर्षी गारपिटीच्या तडाख्यात येत असल्याचा अनुभव आहे. मार्च-एप्रिलमध्ये हे सातत्याने होत आहे. त्यामुळे आगामी काळात हे पीक घ्यावे की नाही या मानसिकतेत आम्ही शेतकरी पोहोचलो आहोत. शासनाने कांदा बीजोत्पादन तसेच इतर हंगामी पिके विम्याच्या कक्षेत आणण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच्या आपत्तीत माझे १० एकरांतील केळी, तीन एकर पपई, तीन एकर मिरची, टरबूज अशी सर्व पिके पूर्णतः गारपिटीत उद्ध्वस्त झाली.  - हेमंत देशमुख, शेतकरी, डोंगरकिन्ही ता. मालेगाव, जि. वाशीम   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com