अकोला ः या हंगामात पिकवलेला कांदा बाजारपेठेत भाव नसल्याने शेतकऱ्यांना रडवतो आहे. नाफेडने राज्यात कांदा खरेदीची घोषणा केली तरी याचे केंद्र या भागात नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होण्याची चिन्हे नाहीत. शासनाने या भागातील कांदा उत्पादन लक्षात घेता खरेदी केंद्र द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
वऱ्हाडात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. सध्या अकोला, बुलडाणा तसेच वाशीम जिल्ह्यात हजारो क्विंटल कांदा तयार झालेला आहे. खुल्या बाजारात कांद्याचा दर पाच ते सात रुपये किलो इतकाही सहजपणे मिळत नाही. त्यातच उन्हाचा तडाखा वाढल्याने व साठवणुकीच्या सोयीसुविधा पुरेशा नसल्याने शेतकऱ्यांना कांदा विक्रीशिवाय पर्याय नाही. शासनाचे खरेदी केंद्र नाही तर दुसरीकडे भावही नाही. अशातच खरीप हंगाम तोंडावर आला आहे.
शासनाने राज्यात नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचे जाहीर केल्यापासून शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. प्रामुख्याने या भागातील कांद्याची खरेदी केली जाईल काय, असा प्रश्न विचारल्या जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात लासलगाव येथील बाजारात खरेदी सुरू करण्यात आली. तेथे दोन दिवस नोंदणी झाली. मात्र, नंतर कोरोनामुळे हे व्यवहार बंद आहेत.
या विभागातील कांदा उत्पादकांच्या नजरा कांदा खरेदीकडे लागल्या आहेत. शासनाने घोषणा केल्यानंतर कुठे नोंदणी करावी, केंद्र कुठे असेल असे प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये विचारले जात आहेत. शासनाने या भागातील कांदा खरेदीसाठी एक केंद्र तातडीने सुरू केले तर शेतकऱ्यांना फायदा होईल. - निंबाजी लखाडे, शेतकरी, खुदलापूर ता. मेहकर जि. बुलडाणा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.