नाशिक : ज्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असेल त्यांना विमा हप्ता न भरता विमा भरपाई रक्कम गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत वारसदाराच्या खात्यात थेट जमा होते. मात्र, लॉकडाऊनमुळे कार्यालये बंद असल्याने अपघाताची माहिती कृषी विभागास वेळेवर देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या विमा योजनेसाठी विमा सल्लागार असलेल्या ‘जयका’ विमा सल्लागार कंपनीकडून ऑनलाइन स्वरूपात माहिती मागविण्यात येत आहे.
प्राप्त माहितीच्या आधारे अपघातग्रस्त शेतकरी व त्याच्या वारसदारास विमासंबंधी येणाऱ्या अडचणी व त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याची माहिती जयका विमा सल्लागार कंपनीचे ग्रामीण राज्य प्रकल्प प्रमुख डॉ. अभिजित आहेर यांनी दिली.
उपक्रमाच्या अनुषंगाने गूगल फॉर्म तयार करून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अपघातग्रस्त शेतकरी किंवा वारसदाराचे नाव, पत्ता, अपघात दिनांक, यासह अपघाताचे कारण, स्वरूप त्यामध्ये मृत्यू किंवा अपंगत्व, दावा पूर्व करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, जमिनीची मालकी आदी आवश्यक बाबींची माहिती या फॉर्ममध्ये भरून घेतली जात आहे. या फॉर्मद्वारे माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला विमा सल्लागार कंपनीकडून फोनद्वारे त्यास मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यासाठी आवश्यक माहिती त्यास दिली जात आहे. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसदाराला रूपये २ लाख व कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास शेतकऱ्याला रुपये १ लाख इतकी रकमेची तरतूद या योजनेत आहे.
योजनेची स्थिती
गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेसाठी सल्लागार म्हणून २ कंपनी काम करते. मात्र, लॉकडाऊन दरम्यान शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये. त्यांचे अर्ज प्रलंबित राहू नये व तात्काळ विमा कंपनीला माहिती दिली जावी. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. - डॉ. अभिजित आहेर, प्रकल्प प्रमुख (ग्रामीण), जयका विमा सल्लागार कंपनी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.