पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघे २८ टक्के पाणी

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघे २८ टक्के पाणी
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघे २८ टक्के पाणी

पुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने पाण्याची मागणी वाढण्याबरोबरच बाष्पीभवनात वाढ झाल्याने जिल्ह्यातील धरणांतील पाणी झपाट्याने कमी होत आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) उजनीसह सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ५९.९० टीएमसी म्हणजे २८ टक्के चल पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर टेमघर, नाझरे, घोड या धरणांचा पाणीसाठा अचल (मृत) पातळीत गेला आहेत. 

उजनीसह पुणे जिल्ह्यातील सर्व २५ धरणांंची चल (उपयुक्त) पाणीसाठ्याची क्षमता २१६.८४ टीएमसी आहे. पुढील काळात उन्हाचा चटका वाढणार असल्याने पाणी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत बरेचसे पाणी शिल्लक ठेवावे लागणार असल्याने शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्यातून काळजीपूर्वक नियोजन करावे लागणार आहे. 

कुकडीच्या खोऱ्यातील येडगाव, माणिकडोह, पिंपळगावसह कलमोडी, वडीवळे, कासारसाई धरणांचा पाणीसाठा तळाशी गेला आहे. धरणांमध्ये शिल्लक पाणीसाठा विचारात घेता भाटघर ९.७८ टीएमसी, मुळशी ७.४६ टीएमसी, वीर ५.५६ टीएमसी, वरसगाव, पानेशत, नीरा देवघर धरणांमध्ये ४ टीएमसी, तर डिंभे, भामा आसखेड, पवना धरणांमध्ये: ३ टीएमसी पाणी आहे. उर्वरित सर्वच मोठ्या धरणांमध्ये तीन टीएमसीपेक्षा कमी पाणी शिल्लक आहे. वीर, खडकवासला, पवना, वडिवळे, भामा आसखेड, डिंभे, घोड, पिंपळगाव जोगे धरणांचे कालवे, बंद पाईपलाइनमधून शेती व पिण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. 

बुधवारी (ता. १३) जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) कंसात टक्केवारी : टेमघर ०.०१ (०), वरसगाव ४.८८(३८), पानशेत ४.७० (४४), खडकवासला १.२७ (६४), पवना ३.८८ (४४), कासारसाई ०.२५ (४५), मुळशी ७.४६ (४०), कलमोडी ०.३५ (२३), चासकमान १.३८ (१८), भामा अासखेड ३.७२ (५९), आंद्रा २.१४ (७३), वडीवळे ०.६३ (५९), गुंजवणी १.३१ (३५), भाटघर ९.७८ (४२), नीरा देवघर ४.१३ (३५), वीर ५.५६ (५९), नाझरे ०.०, माणिकडोह १.१५ (११), पिंपळगाव जोगे ०.६६ (१७), येडगाव ०.८८ (३१), वडज ०.२२ (१९), डिंभे ३.८३ (३१), घोड ०.०२ (०).

उजनीचा पाणीसाठा अचल पातळीकडे उजनीच्या धरणसाठ्यात वेगाने घट होत असल्याने पाणीसाठा अचल पातळीकडे जात आहे. उजनी धरणाच्या चल पाणीसाठ्यात अवघा १.५९ टीएमसी (३ टक्के) पाणीसाठा असून, अचल साठा (६३.६५ टीएमसी) विचारात घेता धरणामध्ये एकूण ६५.२४ टीएमसी (५६ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी जायचा असल्याने उजनीचा पाणीसाठा आणखी खालावणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com