जिल्हा परिषदेने तीन वर्षांत लावलेली ३८ टक्केच रोपे जिवंत

जिल्हा परिषदेने तीन वर्षांत लावलेली ३८ टक्केच रोपे जिवंत
जिल्हा परिषदेने तीन वर्षांत लावलेली ३८ टक्केच रोपे जिवंत

नगर ः शासनाचे ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. सगळी सरकारी यंत्रणा या नियोजनात गुंतलेली आहे. परंतु, लागवडीनंतर रोपण केलेल्या वृक्षांची काळजी घेतली जाते का? हा प्रश्‍न अजूनही अनुत्तरीतच आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात करण्यात आलेली वृक्षलागवड चिंतनीय आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत त्यांनी लावलेल्या २० लाख ३० हजार वृक्षांपैकी फक्त ७ लाख ८१ हजार झाडेच जिवंत असल्याची माहिती त्यांच्याकडूनच प्राप्त झाली. जिवंत वृक्षाची टक्केवारी फक्त ३८ टक्केच आहे.

वृक्षलागवडीत सामाजिक संस्था, खासगी संस्था किंवा व्यक्तीने लावले, तर त्याची निगा राखली जाते. परंतु शासकीय यंत्रणेने झाड लावले तर त्याची पाहिजे तशी निगा राखली जात नसल्याचा इतिहास आहे. राज्यात ३३ कोटी वृक्षलागवडीची मोहिमही शासनाने अशीच गाजावाजा करत सुरू करण्यात आली. त्यासाठी कोट्यवधींच्या निधीचे नियोजनही करण्यात आले. आतापर्यंत २४ कोटी झाडे लावली आहेत. या मोहिमेत आजतागायत साडेबासष्ट लाख नागरिकांनी सहभाग घेतला.

जिल्ह्यातही सव्वा कोटी झाडांचे नियोजन आहे. त्यात जिल्हा परिषदेला ४२ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट मिळाले आहे. परंतु, हे सगळे करताना यापूर्वी लावलेल्या झाडांची स्थिती काय, हा प्रश्‍न आहे. या बाबत माहिती घेतली असता धक्कादायक स्थिती समोर आली. जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांत गेल्या तीन वर्षांत (२०१६, २०१७ आणि २०१८) २० लाख २९ हजार २२२ झाडे लावण्यात आली. मात्र, त्यापैकी फक्त ७ लाख ८० हजार ४६४ झाडेच जिवंत आहेत. झाडे जिवंत असण्याची टक्केवारी फक्त ३८.४६ टक्के आहे. दरवर्षी झाड नवीन असले तरी, खड्डा मात्र तोच असतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

कमी वयाच्या रोपांचाही परिणाम शासनाच्या वृक्षलागवड योजनेत वन विभागाकडून रोपे पुरवली जातात. लागवडीसाठी किमान १८ महिने वयाची रोपे मिळणे गरजेचे असते. मात्र, तसे होत नाही. लागवडीसाठी वन विभागाकडून अत्यंत कमी वयाची रोपे पुरवली जातात. झाडे वाचवण्यासाठी खास यंत्रणा नसल्याने जास्ती वयाची झाडे मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषेदने केली होती. मात्र, तसे झाले नाही. झाडे जगण्यात कमी वयाच्या रोपांचाही परिणाम होत असल्याचे दिसत आहे.

तालुकानिहाय जिवंत झाडांची टक्केवारी ः  अकोले ः ४६.१०, संगमनेर ः ४१.३७, कोपरगाव ः ४३.८४, राहाता ः ५३.५०, श्रीरामपुर ः ४२.२०, राहुरी ः ४४.९०, नेवासा ः ४४.८३, शेवगाव ः ३४.५४, पाथर्डी ः २६.५८, जामखेड ः २५.२६, जामखेड ः ६२.३५, श्रीगोंदा ः ३६.३४, पारनरे ः २७.१८, नगर, ः २०.५०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com