कॉंग्रेस, स्वाभिमानीने वेधले दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष

कॉंग्रेस, स्वाभिमानीने वेधले दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष
कॉंग्रेस, स्वाभिमानीने वेधले दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष

अकोला ः दुष्काळ हा राजकारणाचा खरे तर विषय होऊ शकत नाही. सामान्य नागरिकांच्या जगण्याशी संबंधित असलेल्या या विषयाचे भांडवलही कुणी करणे योग्य नाही. सध्या या भागात दुष्काळाची झळ अधिक बसते आहे. यंत्रणा अद्यापही आचारसंहितेच्या मानसिकतेतून बाहेर आलेली नसल्याने सामान्यांचे मुद्दे सोडवायला कुणी तितके गांभीर्य दाखवित नाही. या आठवड्यात काँग्रेसच्या समितीने वऱ्हाडात काही ठिकाणी भेटी देऊन दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे थोडेसे काम केले. या दौऱ्यानंतर दुष्काळी उपाययोजना किती वेगाने सुरू होतील, नागरिकांना किती दिलासा मिळेल हे सांगणे कठीण आहे. काँग्रेसच्या समितीने बुलडाण्यापासून दौऱ्याची सुरवात केली. दौऱ्यात काही ठिकाणी भेटी व जिल्हाधिकारी आणि माध्यमांसोबत चर्चा असा हा दौरा होता. अकोल्यात समिती आली असताना नियोजनात मोठा विस्कळितपणा दिसला. समिती कुठे जाणार, भेट देणार याची कुठलीही माहिती शेवटच्या क्षणापर्यंत माध्यमांना दिली जात नव्हती. पत्रकारांशी संवाद साधताना याबाबत काही प्रश्नही सदस्यांना विचारण्यात आले. नियोजन चुकीचे होते, असे समितीतील सदस्यांनी प्रत्यक्ष भेटून मान्यही केले. वाशीम जिल्ह्यात समितीने संत्रा उत्पादकांशी सविस्तर चर्चा करून शासन स्तरावर मागण्या मांडण्याचे आश्वासन दिले. समितीप्रमुख विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर शासनाशी काँग्रेस लढा देईल, असेही सांगितले. सध्या वऱ्हाडात बुलडाण्यात सर्वाधिक दुष्काळ आहे. पाणीटंचाई, चाराटंचाई, आगामी हंगामासाठी पीककर्ज असे असंख्य व महत्त्वाचे प्रश्न तेथील नागरिकांना, शेतकऱ्यांना चिंतातूर करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी आॅनलाइन पद्धतीने आढावा घेतला. पण यंत्रणा अद्यापही तितक्याशा जागेवरून हललेल्या नाहीत. चारा छावणीसाठी शेतकरी मागील दीड महिन्यांपासून मागणी केली जात असताना प्रशासनाने आता कुठे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली. २० मेपर्यंत अर्ज स्वीकारून नंतर छावणी सुरू करण्याबाबत हालचाली होतील. मुळात मार्चपासूनच चाराटंचाई वाढली होती. हा मुद्दा स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने लावून धरत आहे. अनेक शेतकरी चारा व पाण्याची व्यवस्था नसल्याने जनावरे विकत आहेत. अशी परिस्थिती असताना शासन व यंत्रणा ‘इलेक्शन मूड’मधून बाहेरच आलेल्या नसल्याचे दिसून आले.  बुलडाण्यात पालकमंत्र्यांनी धावती भेट देत औपचारिकता पूर्ण केली. मुळात अमरावती विभागात हा जिल्हा सर्वाधिक दुष्काळी असताना तेथे पूर्णवेळ पालकमंत्र्यांची गरज असल्याची विरोधक मागणी धरत आहेत. दुर्दैवाने या जिल्ह्याचे पालकत्व घेणारा नेताच सध्या दिसत नसल्याने सामान्य जनता सैरभैर झालेली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल येईपर्यंत यंत्रणा दुष्काळाकडे बघायला फारशा उत्सुक नसल्याची वस्तुस्थिती आहे, एवढे मात्र खरे!

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com