दुष्काळी उपाययोजनांमध्ये सरकार अपयशीः विरोधकांची टीका

दुष्काळी उपाययोजनांमध्ये सरकार अपयशीः विरोधकांची टीका
दुष्काळी उपाययोजनांमध्ये सरकार अपयशीः विरोधकांची टीका

मुंबई : या अधिवेशनात दुष्काळावर चर्चा होणे अपेक्षित होते. दुष्काळी उपाययोजना, शेतकरी कर्जमाफी, पीकविम्याचे अनुदान, केंद्राची मदत, जलयुक्त शिवार, टँकरने पाणीपुरवठा असे अनेक मुद्दे चर्चेला घ्यायचे होते, परंतु ते येऊ शकले नाहीत. त्यासंदर्भात आम्ही सरकारसोबत स्वतंत्रपणे लढा देणार आहोत. तसेच दुष्काळी उपाययोजना आणि नोकर भरतीत भाजप-सेनेचे सरकार साफ अपयशी ठरले आहे, असे टीकास्त्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी (ता. २८) राज्य सरकारवर सोडले. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे अधिवेशन स्थगित झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी विखे पाटील म्हणाले की, राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेत दुष्काळाची भयावहता, त्यासंदर्भात करावयाची उपाययोजना आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात सरकारला आजवर आलेले अपयश यावर आम्ही ऊहापोह करणार होतो. पण अधिवेशन स्थगित झाल्यामुळे ही चर्चा होऊ शकली नाही. अर्थसंकल्पीय चर्चेतील माझे भाषण मी सभागृहाच्या पटलावर ठेवले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देण्याच्या घोषणेतील फोलपणा, एनडीआरएफकडून राज्याला आजवर एक दमडीही न मिळणे, राज्य सरकारकडून दिली जाणारी तुटपुंजी मदत, चारा छावण्यांची आवश्यकता, पाण्याची टंचाई, रोजगाराची उपलब्धता नसणे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होणे अशा अनेक मुद्यांकडे मी या भाषणातून सरकारचे लक्ष वेधल्याची माहिती विखे पाटील यांनी पत्रकारांना दिली. मुख्यमंत्र्यांनी ७२ हजार पदांच्या मेगाभरतीची घोषणा करून आता एक वर्ष झाले. पण अजून एकाही बेरोजगाराला नोकरी मिळालेली नाही. २४ हजार शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासंदर्भात सरकारकडून फसवणूक होत असल्याचेदेखील मी या भाषणामध्ये नमूद केले आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. देशाचे हित व राज्यातील जनतेची सुरक्षा विचारात घेऊन विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी कमी करण्यास आम्ही सहमती दिली. परंतु सरकार आणि भाजप देशहिताला तिलांजली देत आहेत. पाकिस्तानविरुद्ध लढण्यासाठी लष्कराची आणि राज्यांतर्गत सुरक्षेसाठी पोलिसांची तयारी सुरू असताना देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे मंत्री मात्र "मेरा बूथ, सबसे मजबूत"चे कार्यक्रम घेत निवडणुकीच्या तयारीत गुंग आहेत. देशाच्या संरक्षणापेक्षा युद्धातल्या विजयापेक्षा भाजपला निवडणुकीतला पराभव वाचविणे महत्त्वाचे वाटत आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या वेळी केली.  या अधिवेशनात दुष्काळावर चर्चा होणे अपेक्षित होते. दुष्काळी उपाययोजना, शेतकरी कर्जमाफी, पीकविम्याचे अनुदान, केंद्राची मदत, जलयुक्त शिवार, टँकरने पाणीपुरवठा असे अनेक मुद्दे चर्चेला घ्यायचे होते, परंतु ते येऊ शकले नाहीत. त्यासंदर्भात आपण स्वतंत्रपणे सरकारशी लढणार आहोत, असे मुंडे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com