विदर्भातील संत्रा पट्ट्यात आंबिया बहाराची फळगळ 

प्रशासनाच्या संयुक्‍त पंचनाम्याच्या आधारे भरपाई मिळणे गरजेचे आहे. त्याकरिता स्थानिक स्तरावर शेतकरी, कृषी विभाग, महसूल यांची संयुक्‍त समिती स्थापन केली पाहिजे. शेतकरी आणि विमा कंपन्यांमधील वाद सोडविण्यासाठी दुवा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्‍ती करावी. सध्या विमा हप्ता भरल्यानंतर भरपाईबाबत कंपन्या गंभीर राहत नाहीत, असा इतिहास आहे. तशी जबाबदारी कोणावर दिल्याशिवाय हा प्रश्‍न निकाली कसा निघेल. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेज
आंबिया बहारातील संत्र्याची फळगळ होत आहे
आंबिया बहारातील संत्र्याची फळगळ होत आहे

नागपूर ः विदर्भातील वाढत्या तापमानाचा संत्रा पट्ट्यातील आंबिया बहार घेणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. पाणीटंचाई आणि तापमानाचा वाढता पारा या दोन कारणांमुळे आंबिया बहारातील छोट्या फळांची गळ होत आहे. निवडणुकीचे कारण देत याकडे सर्वच यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याने ही समस्या आणखीच गंभीर झाली आहे. हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ अशावेळी मिळणे अपेक्षित असताना तोदेखील मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. विदर्भात सुमारे एक लाख ६० हजार हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. विदर्भात केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेसारखी राष्ट्रीय पातळीवरील संस्था असतानाही संत्रा बागायतदारांना तांत्रिक मार्गदर्शन मात्र मिळत नसल्यामुळे हंगामात अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. यावर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होत ते ४२ ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. त्यामुळे आंबिया बहारातील फळांची गळ झाली. याविषयी तांत्रिक मार्गदर्शन मिळणे अपेक्षित होते. परंतू कोणत्याच यंत्रणेकडून ते मिळाले नाही.

हवामान आधारीत फळपीक विमा योजनेच्या माध्यमातून होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. तीदेखील फोल ठरली आहे. या योजनेत सतत तापमानात वाढ झाली असेल किंवा सतत पावसाची झडी असेल, थंडी पडली असेल तर भरपाई देण्यासंदर्भातील निकष आहेत. परंतू विमा हप्ता भरण्याचे आवाहन करण्यापर्यंतच प्रशासन आणि विमा कंपन्यांकडून जबाबदारी पार पाडली जाते. भरपाईचा मात्र त्यांना सोईस्कर विसर पडतो, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. यावर्षीदेखील तापमानातील वाढीमुळे फळगळ होत असताना विमा कंपनीकडून पंचनामे व इतर सोपस्करांसाठी प्रयत्न होताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. 

यावर्षी आंबिया बहारातील फळांची फूट चांगली असली तरी वाढते तापमान आणि पाण्याची अत्यल्प उपलब्धता यामुळे फळगळीचे प्रमाण वाढत आहे. सोबतच फळे काळी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेसोबतच कृषी विभागाकडून या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र सध्या संत्रा पिकाला काटेकोरपणे पाणी देणे गरजेचे आहे. परंतू संत्रा पट्ट्यात केवळ रात्री वीजपुरवठा होत असल्याने ते शक्‍य होत नाही. त्याकरिता कृषी पंपांना दिवसा चार ते पाच तास वीजपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी महाऑरेंजचे श्रीधर ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तापमानातील वाढीमुळे फळगळ होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी हवामानावर आधारीत फळपीक विमा काढला. परंतु विमा हप्ता भरून घेणाऱ्या कंपनीने आता मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शासनाने अशा प्रकरणात दखल देण्याची गरज आहे, असे संत्रा फळपीक प्रश्नाचे अभ्यासक सुधीर जगताप यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com