ऑरेंज, ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करू : मुख्यमंत्री ठाकरे

ऑरेंज झोनमध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (ता.१) यांनी दिले.
ऑरेंज, ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करू : मुख्यमंत्री ठाकरे
ऑरेंज, ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करू : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील टाळेबंदीसंदर्भात ३ मेनंतर काय करायचे, याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून घ्यावा लागणार आहे. रेड झोनमध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही. परंतु ऑरेंज झोनमध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (ता.१) यांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे. महाराष्ट्र कुठेच कमी नाही, आजही महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आणि यात जिंकणारच आहे. या विषाणूमुळे राज्य संकटात आले आहे, आर्थिक चाक रुतले आहे, रोजगार कमी झाला आहे, अडचणी वाढल्या आहेत, हे काही प्रमाणात खरे असले तरी प्रत्येक राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनताच असते. ही जनता, हे सैनिक वाचले तर त्यांच्या सहकार्याने या अडचणीवर आपण नक्कीच मात करू शकतो आणि करू, असा विश्वास ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, पराक्रमी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचा आनंद आहे. ही भावना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज महाराष्ट्राचा ६० वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने हुतात्म्यांना मुख्यमंत्री म्हणून वंदन करताना, त्यांना अभिवादन करताना अंगावर रोमांच उभे राहिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

परराज्यातील नागरिकांसाठी शिस्तबद्ध योजना परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी सरकारमार्फत शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू आहे. राज्या-राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवले जाईल व त्याच पद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनाही राज्यात परत आणले जाईल, परंतु त्यासाठी गर्दी करू नका, झुंडीने जमा होऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच राज्यांतर्गत अडकलेल्या नागरिकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांचीही त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शेतीचे कामे सुरूच राहणार शेती आणि शेतीसंबंधीचे व्यवहार, कृषी माल वाहतूक, जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक यावर कोणतीही बंधने नाहीत. शेतकऱ्यांना बी-बियाणांची कमी पडणार नाही. हळूहळू यावरची बंधने आपण उठवली आहेत. पण झुंबड झाली तर बंधने टाकावी लागतील, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

लक्षणे दिसताच उपचार करून घ्या अलीकडच्या काळात काही भागात कोरोना रुग्णांचे आकडे वाढलेले दिसत आहेत. परंतु पहिल्या रुग्णाशी संपर्कात आलेले, त्यांचे निकटवर्तीय यांची देखील आपण तपासणी करत आहोत. त्यामुळे हे आकडे वाढलेले दिसत आहेत. कोरोना झाला की सगळे संपले, व्हेंटिलेटर लागले की संपले असे अजिबात नाही. सहा महिन्याच्या बाळापासून ८५ वर्षांच्या आजीपर्यंत सर्वांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे कोरोनाच्या दहशतीतून मोकळे व्हा, वेळेत योग्य उपचार घेतले तर रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी जातात, हे दिसून आले आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच घरच्या घरी उपचार करू नका, तात्काळ "फिव्हर क्‍लिनिक'मध्ये जाऊन उपचार करून घ्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

जुन्या आठवणींना उजाळा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ‘हीरक महोत्सव' धूमधडाक्यात साजरा करावयाचा होता. परंतु आजच्या परिस्थितीत ते शक्‍य नसल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील बाळासाहेब ठाकरे, काका यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग घेतला होता. आज त्यांची, सेनापती बापट, शाहीर अमर शेख यांची आठवण होते. आज मला माझ्या आईची "मॉ'ची देखील आठवण येत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

बीकेसीत ‘कोव्हिड' रुग्णालय महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५० व्या वर्धापनदिनी वांद्रा-कुर्ला संकुलातील (बीकेसी) कार्यक्रमाला लता मंगेशकर यांनी गायलेल्या ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा', या गाण्याची आज आठवण येते. मी लता दीदींना नमस्कार करून आशीर्वाद मागतो, असे म्हणताना, मुख्यमंत्र्यांनी याच वांद्रा-कुर्ला संकुलात ‘कोव्हिड-१९' रुग्णांसाठी रुग्णालय सुरू करणार असल्याची माहिती दिली.

मुंबईत घरोघरी जाऊन २ लाखाहून अधिक तपासण्या आजही ७५ ते ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य, अतिसौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच दिसत नाहीत. असे असले तरी आपण या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करत आहे. मुंबई महापालिका ‘ऑक्‍सिमीटर'च्या साहाय्याने घरोघरी जाऊन तपासण्या करत आहे. आत्तापर्यंत २ लाखाहून अधिक तपासण्या झाल्या. ज्यामध्ये २७२ नागरिकांमध्ये ऑक्‍सिजनची कमी आणि इतर विकार असलेले रुग्ण सापडले. महापालिका आता त्यांच्यावर उपचार करत आहे. कोरोनासंदर्भात जे-जे काही नवीन चांगले घडत आहे ते करण्यास महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

१० हजार जणांना प्रशिक्षण ‘कोव्हिड योद्धा' होऊन सरकारसोबत काम करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास २० हजार नागरिकांनी सरकारसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तर १० हजार जनांनी प्रत्यक्षात तयारी दाखवली. त्यांना आपण प्रशिक्षण देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुंबई, केडीएमसी महापौरांचे कौतुक मुंबई तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. या दोघी परिचारिका असून त्या आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्यास पुढे आल्याचे ते म्हणाले. याप्रमाणेच खासगी डॉक्‍टरांनीही पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. आयुष मंत्रालयाची, होमिओपॅथीची मदत घेत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी टास्कफोर्समधील डॉक्‍टर इतर डॉक्‍टरांना मार्गदर्शन करत आहेत, त्यातून उपचाराची दिशा निश्‍चित होत आहे. संपूर्ण राज्यात यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com