पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. यामुळे फळबाग उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत. पाऊस आल्यास नुकसान होण्याची त्यांना भीती आहे.
यंदा परतीच्या पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, सीताफळ, पेरू, अंजीर या फळबागांचे मोठे नुकसान झाले. आता कुठे शेतकरी सावरत असताना गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यांच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मागील दोन दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस पडला. त्यातच आता ढगाळ वातावरणामुळे या बागा संकटात सापडण्याची शक्यता बळावली आहे.
या शिवाय डाळिंब, बाजरी, मका, ज्वारी, कांदा पिकांनाही ढगाळ हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात द्राक्षासह इतर फळपिकांचे सुमारे ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. द्राक्षाचे नारायणगाव, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांत मोठे क्षेत्र आहे. सध्या द्राक्षांची काढणी वेगात सुरू आहे. पुरंदर, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, दौंड, बारामती या भागांतही डाळिंब उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
द्राक्ष उत्पादक संघाचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई म्हणाले, ‘‘दोन महिन्यांपूर्वी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव वाढल्याने फवारणीचा खर्च वाढला. अनेक फवारण्या करूनही उपयोग होत नसल्याने द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. घड कुजीच्या समस्येमुळे उत्पादनावर ५० टक्के परिणाम झाला. आता अनेक ठिकाणी द्राक्षाची काढणी वेगात सुरू आहे. ढगाळ हवामानामुळे नुकसानीची भीती आहे.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.