सेंद्रिय, विषमुक्त शेतीचा बांधापर्यंत प्रसार महत्त्वाचा

रोफिम
रोफिम

पुणे: सेंद्रिय व विषमुक्त शेती तंत्रज्ञानाचा प्रसार अधिकाधिक होणे व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत हे तंत्रज्ञान पोचणे गरजेचे आहे. स्थानिक पातळीवर या शेतीमालाची बाजारपेठही विकसित व्हायला हवी, असा सूर ‘रोमीफ’ संस्थेच्या पुणे येथे झालेल्या वार्षिक बैठकीत तज्ज्ञांच्या भाषणातून उमटला.  रोमीफ (रेसीड्यू फ्री ॲण्ड ऑरगॅनिक मिशन इंडिया फेडरेशन) या सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा प्रसार करणाऱ्या संस्थेची द्वितीय वार्षिक सभा पुणे-सकाळनगर येथील ‘एपीजी लर्निंग सेंटर’ येथे १५ मे रोजी झाली. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे अध्यक्षस्थानी होते. या वेळी सुमारे २६ जिल्ह्यांतील ‘रोमीफ’चे संचालक, सल्लागार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या वेळी डॉ. मायंदे म्हणाले की, सेंद्रिय व विषमुक्त शेती ही संपूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे तंत्रज्ञान जोपर्यंत सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत या पध्दतीच्या विकासाला मर्यादा आहेत. कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचविण्याची गरज आहे. रोमीफसारख्या संस्थेने कृषी विद्यापीठे व शासनदरबारी सेंद्रिय व विषमुक्त शेतीच्या विकासासाठी दबावगट म्हणून काम करण्याची गरज आहे. पुणे येथील प्रयोगशील सेंद्रिय महिला शेतीतज्ज्ञ वसुधा सरदार म्हणाल्या की, विषमुक्त शेतीला चालना मिळण्यासाठी स्थानिक पातळीवर त्याची बाजारपेठ विकसित व्हायला हवी. सेंद्रिय शेती करायची तर अवशेषांपासून दूर राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सेंद्रिय शेतीतज्ज्ञ दिलीप देशमुख बारडकर यांनी बायोडायनॅमिक शेतीचा वापर करून उत्पादन खर्चात बचत करण्याचे आवाहन या वेळी केले. निवृत्त कृषी अधिकारी गोविंद हांडे यांनी ‘आरएमपी’ पध्दतीच्या माध्यमातून द्राक्षशेतीत मिळविलेले यश, ग्रेपनेट, ट्रेसनेट तसेच निर्यातीविषयीचे महत्त्वाचे मुद्दे उपस्थितांसमोर मांडले. `रोमीफ’चे अध्यक्ष प्रशांत नायकवाडी म्हणाले की, शेतकरी, ग्राहक, विद्यार्थी अशा सर्वांच्या हितासाठी सेंद्रिय व विषमुक्त शेतीचा प्रसार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी आमची संस्था प्रयत्नशील आहे. ‘ॲग्रोवन’चे उपमुख्य उपसंपादक मंदार मुंडले यांनी सेंद्रिय शेतीतील अडचणी, रोग-किडी यांचे उभे ठाकलेले आव्हान, पर्यायी प्रभावी कीडनाशकांचा शोध, ‘एमआरएल’वर आधारित रेसीड्यू फ्री शेती. जागतिक बाजारपेठेची गरज विशद केली. स्पेन देशाने मित्रकीटकांच्या वापरावर आधारित भाजीपाला शेती व निर्यातीतून साधलेले यश विशद केले.  शेतकऱ्यांनी आपल्याच शेतीच्या बांधावर सूक्ष्मजीव प्रयोगशाळा उभारण्याची संकल्पना या वेळी संशोधक डॉ. संतोष चव्हाण यांनी मांडली. सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त निविष्ठांची गरज उद्योजक प्रदीप कोठावदे यांनी व्यक्त केली. डॉ. राजेंद्र देशमुख यांनी सेंद्रिय अन्नाची विश्‍वासाहर्ता वाढविण्यासाठी लेबल क्लेम, लोगो व प्रमाणीकरण यांचे महत्त्व पटवून दिले. एपीजी लर्निंग सेंटरतर्फे चालविल्या जाणाऱ्या शेतीविषयक विविध उपक्रमांची माहती सहायक महाव्यवस्थापक अमोल बिरारी यांनी दिली.  सूत्रसंचालन कबीर पाटील व श्रुती शेडगे यांनी केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com