निर्यातीच्या सेंद्रीय गुळाची स्थानिक बाजारात थेट विक्री 

मंदीमुळे अनेक व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. आम्ही हतबल न होता गूळ निर्मितीत मूल्यवर्धन करून ग्राहकांची पसंती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत. स्थानिक ठिकाणी विक्री सुरु करुन व्यवसायात टिकून राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा फायदा भविष्यातही होणारा आहे. - तुषार कामत
jagery
jagery

कोल्हापूरः लॉकडाऊनमुळे शेतमाल निर्यात ठप्प झाली असून शेतकरी, निर्यातदारांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र, येथील युवा उद्योगपती तुषार कामत यांनी या संकटाच्या काळातही संधी निर्माण करत तेजस ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय गुळाची स्थानिक बाजारात थेट विक्री सुरु केली आहे. तसेच उद्योग विस्तारासाठी सेंद्रिय गुळाचे चॉकलेट, मॅंगो, मसाला असे विविध फ्लेवर्स, चॉकलेट, बिस्किटे बनवली आहेत.  कोरोनाला हरविण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहेत. शरीरात प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठीचे पदार्थ आहारात घेण्यालाही महत्त्व आले आहे. हे ओळखून येथील युवा उद्योगपती तुषार कामत यांनी तेजस ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय गुळाची विक्री सुरु केली आहे. सेंद्रिय गुळाची आखाती देशांत निर्यात करणाऱ्या श्री. कामत यांनी कोरोनामुळे निर्यातीत समस्या आल्याने त्यास स्थानिक बाजारपेठ शोधली आहे. शेतकऱ्यांकडून करार शेती करून त्याद्वारे ते गूळ खरेदी करतात. त्यात पोषक खनिज घटकांचा व फ्लेवर्स यांचा समावेश करुन गुळाचे औषधी महत्व वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत वेगळा प्रयोग करुन त्यांनी व्यवसायवृद्धीसाठी दिशादर्शक काम सुरु केले आहे.  जिल्ह्यात गूळ उद्योगाची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. विविध कारणांमुळे गुऱ्हाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सेंद्रिय गूळ तयार करणे तर आव्हान आहे. या गुळाचे विपणन देखील प्रभावी होत नसल्याने त्याची निर्मिती करणारे शेतकरी मोजकेच आहेत. अशा सुमारे अडीचशे शेतकऱ्यांशी संपर्क साधत कोल्हापूर येथील युवा उद्योजक तुषार कामत यांनी तेजस ऑरगॅनिक शेतकरी उत्पादक कंपनीची सुरवात केली. ते गूळ उत्पादकांसोबत करार शेती करतात. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य दर देवून सेंद्रिय गुळाची निर्मिती त्यांच्याकडून करुन घेतली. सेंद्रिय गूळ निर्मितीचे पीजीएस प्रमाणपत्रही घेतले आहे. आवश्‍यक पोषकद्रव्ये गुळात समाविष्ट केला आहे. शेतकऱ्यांकडून ते महिन्याला वीस टन गुळाची खरेदी करतात. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी आखाती देशांशी संपर्क साधून तेथे गूळ पाठविण्यास सुरवात केली आहे. सध्या कोरोना काळात निर्यातीत समस्या आल्याने मंदीच्या काळात त्यांनी उद्योग विस्ताराची नामी संधी शोधली. सेंद्रिय गुळाचे चॉकलेट, मॅंगो, मसाला असे विविध फ्लेवर्स, चॉकलेट, बिस्किटे बनवली. इंटरनेटच्या माध्यमातून आखाती देशातील कंपन्यांपर्यंत उत्पादनांची माहिती पोचवली आहे. 

गूळ उत्पादकांना फायदा  सेंद्रीय गुळाला सौद्यात वेगळा दर मिळत नसल्याने शेतकरी या गुळाकडे वळत नाहीत. परंतु कामत यांनी पहिल्यांदा शेतकऱ्याला दराबाबत हमी दिली. थेट त्यांच्याकडून खरेदी करीत किलोस पन्नास रुपये दर त्यांना दिला जातो. आठवड्यात रक्कम दिली जाते. जादा दर मिळत असल्याने अनेक शेतकरी त्यांच्याशी जोडले जात आहेत. अर्धा व एक किलो वजनामध्ये गूळ तयार केला आहे. 

सध्या कोल्हापुरात विक्री  निर्यातीत सध्या समस्या असल्याने सेंद्रिय गूळ कोल्हापुरात विकला जात आहे. किलोला ६० रूपये त्याचा दर आहे. गुळात औषधी गुणधर्म असणारे घटक समाविष्ट केल्याने प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी तो महत्त्वाचा ठरत असल्याचे श्री. कामत यांनी सांगितले. 

संपर्कः  ९९२२२३०९२९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com