हिंगोली : ‘‘मानवी आरोग्य अबाधित राखण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पीकविलेला भाजीपाला, शेतीमालाचा आहारात समावेश आवश्यक आहे. विक्री केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पीकविलेला ताजा भाजीपाला, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शेतमाल शहरातील नागरिकांना उपलब्ध होईल,’’ असे प्रतिपादन वसमतचे तालुका कृषी अधिकारी जी. बी. कल्याणपाड यांनी केले.
वसमत (जि. हिंगोली) शहरातील सरस्वतीनगर येथे सेंदिय शेतकरी गटाच्या वसुंधरा सेंद्रिय भाजीपाला व शेतमाल विक्री केंद्राचे उद्धघाटन कल्याणपाड यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी अधिकारी शंकर उपलवाड, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक के. एस घुगे, शेतकरी गटांचे सदस्य दादाराव राऊत, बालाजी राऊत, श्रीहरी अंभोरे, बबनराब अंभोरे, मदनराव हरबळे, विश्वनाथ राऊत, रुस्तुमराव थोरवते, ज्ञानेश्वर राऊत परिसरातील सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत (आत्मा) परंपरागत कृषी विकास योजनेत पीजीएस या पोर्टलवर सन २०१६-१७ मध्ये या गटाची नोंदणी करण्यात आली. या गटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, जैविक कीटकनाशके, खते, सेंद्रिय बियाणे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. वेळोवेळी मातीतपासणी, कीटकनाशक अंशतपासणी आदी सुविधा योजनेमार्फत देण्यात आल्या.
सेंद्रिय शेतमाल विपणनसंबंधी शेतकऱ्यांना कृषी विभाग व ‘आत्मा’तर्फे मार्गदर्शन करण्यात येत आहे. गटामार्फत सेंद्रिय भाजीपाला, सर्व प्रकारचे अन्नधान्य, हळद पावडर, लोणचे आदी उत्पादने प्रतवारी, पॅकिंग करून ग्राहकांपर्यंत पोचवली जात आहेत. वसुंधरा या ब्रॅंड नावाने सेंद्रिय शेतीमालाची नोंदणी करण्यात आल्याचे दादाराव आणि बाळासाहेब राऊत यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.