शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेने देशभर संताप

कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर दोन मोटारी घातल्याने चार शेतकऱ्यांसह एका पत्रकाराच्या मृत्यूच्या घटनेचा देशभरात तीव्र निषेध आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Outrage across the country over the incident of crushing farmers
Outrage across the country over the incident of crushing farmers

लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश : येथे कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर दोन मोटारी घातल्याने चार शेतकऱ्यांसह एका पत्रकाराच्या मृत्यूच्या घटनेचा देशभरात तीव्र निषेध आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता.४) देशभरात शेतकरी, शेतकरी नेते, सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षांनी निर्देशने केली. 

दरम्यान, केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलासह इतरांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मृतांच्या नातेवाइकांना मदत आणि नोकरी राज्य सरकारने जाहीर केली आहे. 

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या दहा महिन्यांपासून राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहे. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तरांचल आदी राज्यांत आंदोलनाची तीव्रता अधिक आहे. या राज्यांत सरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार आणि विरोधाची भूमिका येथील शेतकरी संघटना आणि जात पंचायतींनी घेतली आहे. अशातच रविवारी (ता.३) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे एका राजकीय कार्यक्रमासाठी असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यादरम्यान रॅलीतील दोन मोटारींनी शेतकऱ्यांना चिरडण्याची संतप्तजनक घटना घडल्याने संपूर्ण देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

याबाबत उपलब्ध माहिती अशी की, रविवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी लखीमपूर खेरी येथे आले होते. त्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच कृषी कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन करणारे शेतकरी ते उतरणार असलेल्या हेलिपॅडपाशी सकाळी आठ वाजताच पोहोचले. त्यांनी हेलिपॅडवर ठिय्या दिला. त्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता मोटारीने मिश्रा आणि मौर्य यांचा ताफा तिकोनिया चौकातून गेला, तेव्हा त्यांना काळे झेंडे शेतकऱ्यांनी दाखविले. याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या आणि त्यांनी शेतकऱ्यांना चिरडले. यात चार शेतकऱ्यांसह एका पत्रकाराचा मृत्यू झाला, तर १० ते १५ जण जखमी झाले. ज्या दोन गाड्या गर्दीत घुसल्या त्यांना थांबविताना एका महिला पोलिसासह दोन पोलिस जखमी झाले. 

या घटनेचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. रात्रीच शेतकरी महापंचायती होऊन शेतकरी, शेतकरी नेते, लखीमपूर खेरीच्या दिशेने निघाले. यामुळे उत्तर प्रदेशसह सीमावर्ती राज्यात तणाव निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात पोलिस बळ येथे तैनात करण्यात आले. शेतकऱ्यांनी जोपर्यंत गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल होत नाही, संपूर्ण घटनेची निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून चौकशी करणे आणि मृतांच्या कुटुंबियांना भरपाई मिळत नाही, तोपर्यंत मृत शेतकऱ्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. 

सरकारकडून मदत जाहीर सोमवारी दुपारी राज्य सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४५ लाख रुपये, जखमीस १० लाख रुपये मदत, एका मुलास सरकारी नोकरी देण्याचे जाहीर केले. तसेच गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष याच्यासह इतरांवर हत्येचा तिकोना येथे गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीद्वारे घटनेची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

‘माझा मुलगा नव्हता’ दरम्यान गृहराज्यमंत्री टेनी यांनी आपला मुलगा घटनास्थळी उपस्थित नव्हता असा दावा केला असून, काही उपद्रवींनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळी गाड्यांवर दगडफेक केल्यानंतर ही दुदैवी घटना घडल्याचे ते म्हणाले. तसेच या घटनेच्या निष्पक्ष न्यायालयीन चौकशीची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने रविवारी (ता.३) दिलेल्या माहितीनुसार, दोन मोटारींनी चिरडल्यामुळे दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यानंतर शेतकरी संतप्त झाले व त्यांनी मोटारी पेटवून दिल्या मोटारीतील लोकांना मारहाण केली. त्या मारहाणीत मोटारीतील चौघांचा मृत्यू झाला. यापैकी एका गाडीत अजय मिश्रा यांचा मुलगा अभिषेक असल्याचे बोलले जात होते. मात्र अभिषेक त्या वेळी गाडीत नव्हता असा खुलासा नंतर मंत्री मिश्रा यांनी केला. तसेच काही जणांनी केलेल्या मारहाणीत भाजपचे तीन कार्यकर्ते आणि गाडीच्या चालकाचा मृत्यू झाला, असेही मिश्रा यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले. गाड्यांचा ताफा तेथून जात असताना त्यावर दगडफेक करण्यात आल्याने दोन मोटारींचे नियंत्रण सुटले व त्या उलटल्या. त्याखाली दोन शेतकरी मृत्युमुखी पडले, अशी माहितीही मिश्रा यांनी दिली. 

प्रियांका, अखिलेश यांना अटक लखीमपूर खेरीच्या हत्याकांड स्थळाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना रविवारी रात्री उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली. यावेळी समाजमाध्यमांवर बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या,‘‘ज्या प्रकारे या देशातील शेतकऱ्यांना दाबले जात आहे. याबाबत आता शब्दच राहिलेले नाहीत.’’ 

चन्नी, बाघेलांना रोखले लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या भेटीस येण्यासाठी निघणाऱ्या पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना लखनौ हवाईअड्ड्यावर येण्यास उत्तर प्रदेश सरकारकडून मनाई करण्यात आली. या दोघांनीही घटनेची निंदा करत योगी सरकारवर ताशेरे ओढले होते. 

अत्यंत दुदैवी घटना : मुख्यमंत्री आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरीतील घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तसेच घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हटले असून सरकार संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी करेल आणि दोषींविरोधात कडक कारवाई करेल, असे आश्‍वासन राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात दिले आहे.  शेतकऱ्यांच्या मागण्या

  • केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलासह इतरांवर हत्येचा गुन्हा दाखल करणे
  • उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून प्रकरणाची चौकशी करणे
  • मंत्र्याच्या चिथावणीखोर व्डिडिओचा तक्रारीत समावेश करणे
  • मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना निधी आणि सरकारी नोकरी
  • भाजप सरकार शेतकऱ्यांना संपविण्यासाठी राजकारणातून त्यांचे दमन करत आहे. मात्र, शेतकरी आपल्या न्यायाची लढाई जिंकतील. - राहुल गांधी, कॉंग्रेस नेते

    भाजप सरकार आंदोलनाची बदनामी करण्यासाठी हिंसाचाराचा वापर करत आहे. लखीमपूर घटनेनंतर सर्वत्र संतप्त वातावरण आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात सध्या फिरू नये.  - नरेश टिकैत, अध्यक्ष, भारतीय किसान युनियन

    - शेतकऱ्यांना कशी वागणूक दिली गेली, यातून सरकारची मानसिकता कळते. जर कोणी सरकारविरोधात उभा राहिला, तर त्यांचे दमन केले जाईल, असे लखीमपूर घटनेतून समोर येते. - भूपेश बघेल, मुख्यमंत्री, छत्तीसगड

    उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला लोकशाही संपवायची आहे का? केवळ हुकूमशाही सरकारच हे करू शकते. विरोध पक्ष नेत्यांना बेकायदेशीररीत्या ताब्यात घेणे, ही लोकशाही मूल्यांची पायमल्ली आहे.  - अशोक गेहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान

    राज्यात विधानसभेच्या निवडणूक काही महिन्यांवर आल्या आहेत. अशातच लखीमपूर घटनेचा राजकीय फायदा घेण्यासाठी विरोधी पक्षांनी राजकीय पर्यटन सुरू केले आहे. यामुळे तपास यंत्रणा प्रभावित होते. - सिद्धार्थनाथ सिंह, मंत्री, उत्तर प्रदेश

    या घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा द्यावा. - अखिलेश यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख

    शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याची क्रूर पद्धत. मी लखीमपूर खेरी मध्ये घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो. - शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

    आपल्या हक्कांसाठी तर आम्ही मुगल आणि इंग्रजांसमोरपण झुकलो नाही. शेतकऱ्यांच्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नये. शेतकरी मरू शकतो, पण तो घाबरणारा नाही. सरकारने जागे व्हावे, लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांच्या हत्या करणाऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. - राकेश टिकैत, शेतकरी नेते

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com