राजस्थानमध्ये टोळधाडीने ६४ हजार हेक्टरवरील पीक फस्त

टोळधाडीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. या धोकायदायक टोळंपासून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी आणि टोळ नियंत्रणासाठी सरकराने ड्रोन पाठविले आहेत. टोळग्रस्त शेतकऱ्यांना टोळ नियंत्रणासाठी उपाय सुचविण्याकरिता अमेरिकेच्या तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत आहे. - कैलाश चौधरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री
locust
locust

नवी दिल्लीः राजस्थानमधील सहा जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शेतात सध्या रब्बी हंगामातील पिके असून टोळांनी या पिकांवर आक्रमण केले आहे. टोळांनी जिरे, इसबगोल, मोहरी आणि गव्हाचे जवळपास ६४ हजार हेक्टरवरील पीक फस्त केले आहे. प्रादुर्भावग्रस्त पिकांमध्ये तब्बल ७० टक्के क्षेत्र हे फुलोऱ्यात आलेल्या मोहरी पिकाचे आहे, अशी माहिती जालोरचे कृषी उपसंचालक आर. बी. सिंग यांनी दिली.  पाकिस्तानच्या सीमाभागातून टोळांनी गुजरात आणि राजस्थानमध्ये प्रवेश केला आहे. राजस्थानमधील बारमेर, जालोर, जैसलमेर, जोधपूर जिल्हा तसेच नागौर आणि बिकानेर जिल्ह्याच्या काही भागांत टोळांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. बहुतांश गुलाबी टोळ असून ते अपरिपक्व आहेत आणि प्रजनन करण्यास असक्षम आहेत. या जिल्ह्यांमध्ये टोळांनी जिरे, इसबगोल, मोहरी आणि गव्हाचे जवळपास ६४ हजार हेक्टरवरील पीक फस्त केले आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.  श्री. सिंग म्हणाले, की पीकनुकसानीची पाहणी सुरू आहे आणि पुढील आठवड्यापर्यंत हे काम चालू राहण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला आहे त्यांना विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळेल. पीकविमा नसलेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत दिली जाईल. ‘‘मागील वर्षी शेवटच्या काळात टोळांनी भारतातून माघार घेतली होती. परंतु बदलत्या कृषी वातावरणामुळे आणि पाश्‍चिमात्य भागातील वातावरणामुळे टोळांचे थवे डिसेंबरच्या मध्यानंतर परत भारतात दाखल झाले,’’ असे श्री. सिंग म्हणाले.  गुजरातमध्ये २५ हजार हेक्टरवरील पिकांचा फडशा गुजरातमध्ये टोळधाडीने जिरे आणि मोहरी पिकांचे सर्वाधिक नुकसान केले आहे. टोळांच्या थव्यांनी बनासकंठा जिल्ह्यातील आणि पाटण जिल्ह्यात काही भागांतील २५ हजार २२२ हेक्टरवरील जिरे, मोहरी, गहू, एरंडेल आणि बडिशेप पिकांचे नुकसान केले आहे. राज्यातील २८५ गावांतील शेतपिकांना टोळधाडीचा फटका बसला आहे. यापैकी बनासकंठा जिल्ह्यातील २८० आणि पाटण जिल्ह्यातील ५ गावांचा समावेश आहे. बनासकंठा जिल्ह्यातील थारड, वाव सुईगम तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com