संपूर्ण कर्जमाफीसाठी लागणार 'एवढी' रक्कम...

राज्यातील बळिराजाला संपूर्ण कर्जमुक्‍त करण्यासाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांची गरज आहे. त्यातून सुमारे एक कोटी शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल. मात्र, श्रीमंत व बड्या राजकीय पुढाकाऱ्यांना कर्जमुक्‍ती कशाला पाहिजे? - सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थमंत्री
crop loan
crop loan

सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर, अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट या नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत बळिराजाची खडतर वाटचाल सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील एक कोटी १३ लाख शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. मात्र, त्यासाठी तब्बल एक लाख कोटी रुपये लागणार असून एवढी मोठी रक्‍कम उभी करायची कशी, यादृष्टीने केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

फडणवीस सरकारने जुलै २०१७ मध्ये राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दीड लाखाची कर्जमाफी दिली, तर दीड लाखाहून अधिक कर्जदारांना उर्वरित रक्‍कम भरल्यावरच कर्जमाफीचा लाभ मिळेल, असेही स्पष्ट केले. दुसरीकडे मागच्या वर्षीचा दुष्काळ, हमीभावाची प्रतीक्षा, एकरकमी एफआरपी मिळेना आणि या वर्षीचा पूर व अतिवृष्टीमुळे बॅंकांचे कर्ज फेडणे शेतकऱ्यांना मुश्‍कील झाले. दरम्यान, मागील पाच वर्षांतील नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी आत्महत्याही वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता संपूर्ण कर्जमाफीसाठी हालचाली सुरू असून, केंद्र सरकारशी चर्चाही सुरू आहे. मात्र, राज्यातील बळिराजाचा सातबारा कोरा करण्यासाठी अटी अन्‌ निकष काय असतील, यावरही चर्चा सुरू असल्याचे वित्त विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यातील बळिराजाला कर्जमुक्‍त करण्यासाठी एक लाख कोटींची गरज असल्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ओटीएसची मुदत ऑक्‍टोबरला संपली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्‍कम बॅंकांमध्ये भरणे बंधनकारक आहे. त्यांच्यासाठी एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरू केली आणि आतापर्यंत या योजनेला सहावेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ऑक्‍टोबर २०१९ ला ओटीएसची मुदतवाढ संपली आणि त्यानंतर मुदतवाढ दिलीच नाही, त्यामुळे दीड लाखावरील थकबाकीदारांची पंचाईत झाली आहे.

राज्याची सद्यःस्थिती

  • जून २०१९ पर्यंत थकबाकीदार : ५६.९२ लाख
  • जिल्हा बॅंकांची शेतीची थकबाकी : ४९,६०० कोटी
  • संपूर्ण कर्जमाफीतील शेतकरी : १.१३ कोटी
  • कर्जमुक्‍तीसाठी लागणारी रक्‍कम : १.०३ लाख कोटी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com