उष्णतेचा दाह जनावरांनाही

जादा संख्येने जनावरे असल्याने आम्ही जनावरांना चोवीस तास पाण्याची सोय करून दिली आहे. याचबरोबर दिवसांतून दोन वेळा जनावरांना धुऊन त्यांच्या शरीराचे तापमान योग्य ठेवण्याबाबत प्रयत्न सुरू केले आहेत. आहारातही प्राधान्याने बदल केल्याने दूध संकलन घटीचे प्रमाण काही अंशी कमी झाले. जी म्हैस किंवा गाय पंधरा टक्के दूध कमी देत होती, ते प्रमाण आता दहा टक्क्यांवर आले आहे. - दादा मोरे, दुग्धोत्पादक, रांगोळी, जि. कोल्हापूर
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर ः गेल्या काही दिवसांपासून तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने याचा विपरीत परिणाम पशुपालनावर होत आहे. राज्याच्या तुलनेत थोड्या थंड असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पारा गेल्याने दुभती जनावरे अस्वस्थ झाली आहेत. याचा विपरीत परिणाम दूध संकलनावर होत असून गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत एप्रिल महिन्यात दुधाच्या संकलनात सुमारे वीस टक्क्यांनी घट झाली आहे. वाढत्या उन्हाने पशुपालक हबकून गेला आहे. जिथे गारव्याची, ओल्या चाऱ्याची सोय नाही तेथील जनावरांची केविलवाणी स्थिती असल्याचे चित्र आहे. बहुतांशी पशुपालक, गोठा व्यावसायिक जनावरांच्या गोठ्यात थंडावा निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. परंतू तरीही त्यांना दुधाचे संकलन वाढविण्यात अपयश येत असल्याचे चित्र आहे. दूध संघांच्या प्रतिनिधींनीही याला दुजोरा दिला. 

पाण्याच्या नियोजनाला प्राधान्य  ज्या पशुपालकाकडे एक ते दोन जनावरे आहेत, त्यांनी कसेतरी करून जनावरांना जादा पाणी देऊन थंडावा देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू जे गोठा व्यावसायिक आहेत त्यांना मात्र गेल्या पंधरा दिवसात इतर कोणत्याही व्यवस्थापनापेक्षा सुमारे ८० टक्के व्यवस्थापन हे थंडाव्यासाठी करावे लागत आहे. नियमित व्यवस्थापनेत सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा पाणी जनावरांना दिले जात आहे. पण वाढत्या उष्म्यामुळे हे प्रमाण वाढत असून तीन ते चार वेळा पाणी द्यावे लागत आहे. अनेक गोठाधारक गव्हाणीत चारा संपल्या संपल्या त्याच ठिकाणी पाणी सोडून पाणी कमी पडू नये याची दक्षता घेत आहेत. केवळ पंख्याच्या वापरामुळे गारवा येत नसल्याने कुलरची संख्या वाढविण्यासाठीही पशुपालकांकडून प्रयत्न सुरुरू आहेत.

ओल्या चाऱ्याला मागणी वाढली सध्या उन्हाळा असल्याने ओला चारा मिळणे अशक्‍य असते. यामुळे शेतकरी कडब्याची जुळणी करून ठेवतात. पण केवळ कडब्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने गवत, मका आदी हिरव्या चाऱ्यांना मागणी वाढत आहे. गळीत हंगाम संपल्याने आता हिरव्या चारा शोधणे अशक्‍य बनत आहे. चारा व्यवस्थापन करताना जास्तीत जास्त हिरवा चारा जनावरांना दिला जाईल याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी हिरव्या चाऱ्याच्या किमतीतही दहा ते पंधरा टक्क्‍यांनी वाढ झाल्याची माहिती चारा विक्रेत्यांनी दिली. वाढता उन्हाळा व पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करणे अशक्‍य होत असल्याने अडचणीत वाढच होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

आहार व्यवस्थापनातही बदल  पशुपालकांनी दिलेल्या माहितीनुसार चाऱ्याबरोबरच पशुखाद्यात मीठ, साखरेचे प्रमाण वाढवून उष्णता कमी करण्यसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कितीही प्रयत्न केले तरी दुधातील घट थांबणारी नसली तरी किमान प्रयत्न करून दूध संकलन कमीत कमी घटेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हिरवा चारा उपलब्धतेसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे गोठा व्यावसायिकांनी सांगितले.  जादा उन्हामुळे जनावरांच्या रवंथ क्रियेत  अडथळे निर्माण होतात. अतिउष्णतेमुळे दिवसभर जनावरे धापतात. यामुळे फक्त रात्रीच ती रवंथ करू शकतात. जनावरे शांत नसल्याने याचा साहजिकच परिणाम दुधावर होतो. पाणी, हिरव्या चाऱ्याचे प्रमाण वाढविणे, पुरेशी सावली जनावरांवर असेल याची काळजी घेणे या परिस्थितीत गरजेचे बनले आहे, असे पशुवैद्यकीय अधिकारी  डॉ. अनिल रणदिवे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com